रस्ते लहान मुलांसाठी धोकादायकच!
By Admin | Updated: May 8, 2015 00:44 IST2015-05-08T00:44:53+5:302015-05-08T00:44:53+5:30
वाहतूक कोंडी, रस्त्यांची स्थिती आणि बेदरकारपणे वाहतुकीचे नियम मोडून गाडी चालविणाऱ्या चालकांमुळे दिवसेंदिवस रस्ते अपघातांत भर पडत आहेत.

रस्ते लहान मुलांसाठी धोकादायकच!
मुंबई : वाहतूक कोंडी, रस्त्यांची स्थिती आणि बेदरकारपणे वाहतुकीचे नियम मोडून गाडी चालविणाऱ्या चालकांमुळे दिवसेंदिवस रस्ते अपघातांत भर पडत आहेत. शिवाय, या रस्ते अपघातांत चिमुरड्यांचा बळी जाण्याची संख्या वाढीस लागली आहे. याविषयी, सेव्ह लाइफ फाउंडेशनला माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात ४३४ चिमुरड्यांना रस्ते अपघातात जीव गमवावा लागला आहे.
सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘यूएन ग्लोबल रोड सेफ्टी वीक २०१५’ अंतर्गत ही फाउंडेशन ‘सेव्ह कीड्स लाईव्हस्’ ही संकल्पना राबवित आहे. त्याअंतर्गत, रस्ता सुरक्षा आणि लहान मुलांचे अपघात याविषयी संस्थेने संशोधनात्मक उपक्रम सुरू केले आहेत. त्यात राज्यात रस्ते, महामार्गाच्या विकासाबाबत एका बाजूला बोलले जात असताना दुसऱ्या बाजूला मात्र राज्यातील रस्ते चिमुरड्यांसाठी धोकादायकच असल्याचे उघड झाले आहे. २०१३ साली राज्यात ३५१ चिमुरड्यांचा अपघातात मृत्यू झाला होता, मात्र २०१४मध्ये या संख्येत २३.५ टक्क्यांनी वाढ झालेली दिसून आली आहे. भारतात प्रत्येक दिवशी चौदा वर्षांखालील २० मुलांचा रस्ते अपघातात मृत्यू होत असल्याचे दिसून आले आहे.
महाराष्ट्राच्या तुलनेत तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशमध्ये मात्र चिमुरड्यांच्या रस्ते अपघाताच्या संख्येत घट झाली आहे. २०१३ साली ३८० लहानग्यांचा रस्ते अपघातात मृत्यू ओढावला होता, परंतु २०१४मध्ये या संख्येत घट होऊन ३५१ चिमुरड्यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. उत्तर प्रदेशमध्येही ही संख्या ८२५ वरून ६३८ आल्याचे दिसून आले. तर दिल्लीमध्ये पुन्हा या आकड्यांत तफावत जाणवली, त्यात २०१३ साली १४५ लहानग्यांचा रस्ते अपघातात मृत्यू ओढावला; पण २०१४मध्ये ही संख्या ९१८वर येऊन ठेपली.
दरम्यान, रस्त्यांवर होणारे लहान मुलांचे अपघात टाळण्यासाठी त्यांना विशेष संरक्षण पाऊले, चाइल्ड झोन्स, लहान मुलांसाठी हेल्मेट्स, वाहतुकीच्या नियमांमध्ये लहान मुलांच्या दृष्टिकोनातून विशेष तरतुदीचा विचार करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे अचूक आणि योग्य रस्ते सुरक्षा विधेयकाचा आग्रह धरून शासनाने पुढाकार घेतला पाहिजे, असे ‘सेव्ह लाइफ फाउंडेशन’चे संस्थापक पीयूष तिवारी यांनी म्हटले आहे. (प्रतिनिधी)