पर्यावरणासाठी कठोर अंमलबजावणी
By Admin | Updated: June 7, 2015 03:03 IST2015-06-07T03:03:48+5:302015-06-07T03:03:48+5:30
पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी दीर्घकालीन परिणाम करणारे धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता

पर्यावरणासाठी कठोर अंमलबजावणी
ठाणे : पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी दीर्घकालीन परिणाम करणारे धोरणात्मक निर्णय घेण्याची आवश्यकता होती आणि ही गरज मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार पूर्ण करीत असून घनकचरा व्यवस्थापन, अपारंपरिक ऊर्जेचा वापर, ई-कचरा, सामाजिक वनीकरण अशा प्रत्येक क्षेत्रातील नव्या धोरणांची पायाभरणी केली जात आहे, त्याचे परिणाम येत्या काही वर्षांत आपल्याला पाहायला मिळतील, असा विश्वास केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी येथे बोलताना व्यक्त केला.
समर्थ भारत व्यासपीठ आयोजित ग्रीन आयडिया प्रदर्शनाच्या निमित्ताने पर्यावरण क्षेत्रातील विविध पुरस्कार वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी आमदार संजय केळकर, महापौर संजय मोरे, समर्थ भारत व्यासपीठाचे उपाध्यक्ष उल्हास कार्ले आदी मान्यवर उपस्थित होते.
सौरऊर्जेच्या उत्पादनांवरील कर कमी करणे, ई-कार, बायोडिझेल अशा प्रत्येक क्षेत्रातील विषयातील भविष्यातील गरज लक्षात घेऊन त्यांना प्रोत्साहित करणे, यासारखी पावले नवे सरकार उचलत आहे. मानवनिर्मित जंगले यासारखे अभिनव प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत. ई-कचरा, घनकचरा व्यवस्थापन, हरित इमारत, अपारंपरिक ऊर्जेचा वापर याविषयी महत्त्वाचे धोरणात्मक आणि दीर्घकालीन परिणाम करणारे निर्णय घेतल्याची माहिती त्यांनी दिली.
या वेळी जावडेकरांच्या हस्ते संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील रेस्क्यू टीम, रानवाटाकार स्वप्निल पवार यांचा ग्रीन आयडिया पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. तसेच समर्थ भारत व्यासपीठ व न्यू एज मीडिया पार्टनर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात येत असलेल्या ग्रीन आयडिया हंट या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.