खलील गिरकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: ‘म्हाडा’ने धोकादायक इमारत म्हणून नोटीस दिलेल्या इमारतींमधील रहिवासी जीव मुठीत घेऊन वास्तव्य करत आहेत. या रहिवाशांना इमारतीचा पुनर्विकास हवा आहे. मात्र, काही अडचणींमुळे त्यांचे स्वप्न पूर्ण झालेले नाही. म्हाडाकडून जुन्या व उपकर प्राप्त इमारतींचे पावसाळापूर्व सर्वेक्षण करून धोकादायक इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत. दादर येथील माधवदास पास्ता रोड येथील मिनर्व्हा इमारत व मिनर्व्हा मॅन्शन या धोकादायक इमारती आहेत.
या इमारतींची मालकी एलआयसीकडे आहे. म्हाडा व एलआयसी या दोन सरकारी आस्थापनांत अडकलेले हे रहिवासी पुनर्विकास नेमका कधी होणार, याकडे डोळे लावून बसले आहेत. या दोन्ही इमारतींत ८५ कुटुंबे राहतात. या इमारतींना १२४ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे त्यांची दुरवस्था झालेली आहे. तीन मजली इमारतींमधील तिसऱ्या मजल्यावरील रहिवाशांची पावसाळा आला की चिंता वाढते.
भाडे देऊनही पुरेशा सुविधा नाहीत
येथील काही जणांचे भाडे ५ हजारांपर्यंत आहे, मात्र ते दिल्यानंतरही पुरेशा सुविधा मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली. सफाई, वीज यासाठी त्यांना वर्गणी काढावी लागते. कोणती तक्रार करायची असल्यास एलआयसीच्या कार्यालयात जावे लागते. या इमारतींमध्ये बहुसंख्य सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक राहतात, त्यामुळे त्यांना अधिकच त्रास सहन करावा लागत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. येथील रहिवासी हेमंत हडकर म्हणाले, या इमारतींमध्ये यापूर्वी आमदार कालिदास कोळंबकर यांच्या सहकार्याने दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे आम्हाला काहीसा दिलासा मिळाला होता.
या आधी कोसळले होते प्लास्टर
पाऊस सुरू झाला की, गळती लागलेल्या ठिकाणी भांडी ठेवावी लागतात, असे महिलांनी सांगितले. या आधी दुसऱ्या मजल्यावरील छताचे प्लास्टर कोसळून ज्येष्ठ नागरिक जखमी झाले होते. इमारतीच्या पीलरला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत.
धोकादायक इमारतीची नोटीस मिळालेल्या नायगाव क्रॉस रोड येथील दस्तुर बंगल्याचे निष्कासन करण्यात येत असून म्हाडाच्या निर्देशाप्रमाणे पुढील प्रक्रिया राबवली जाईल.-देवेंद्र परब, रहिवासी