मरणाच्या दाढेतही रहिवाशांचा हेका

By Admin | Updated: June 8, 2015 02:54 IST2015-06-08T02:54:59+5:302015-06-08T02:54:59+5:30

पवईच्या लेक होम या उच्चभ्रू टॉवरला लागलेल्या आगीने अशा हायप्रोफाईल सोसायटयांमध्ये वास्तव्य करणाऱ्यांची नकारात्मक मनोवृत्ती प्रकर्षाने पुढे आली.

Rescue of residents in death | मरणाच्या दाढेतही रहिवाशांचा हेका

मरणाच्या दाढेतही रहिवाशांचा हेका

मनिषा म्हात्रे/ समीर कर्णुक, मुंबई
पवईच्या लेक होम या उच्चभ्रू टॉवरला लागलेल्या आगीने अशा हायप्रोफाईल सोसायटयांमध्ये वास्तव्य करणाऱ्यांची नकारात्मक मनोवृत्ती प्रकर्षाने पुढे आली. आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाआधी इमारतीत धाव घेणाऱ्या पवई पोलिसांना रहिवाशांनी अजिबात मदत केली नाही. अनेकांनी त्यांच्या तोंडावर दार आपटले. काहींनी चोरीचा भीतीने त्यांना घरात येण्यापासून मनाई केली. इतकेच काय तर महागडया गाडयांना वाचविण्यासाठी रहिवाशांनी जी धडपड केली त्यामुळे अग्निशमन दलाला इमारतीत यायला पाऊण तास लागला.
रहिवाशांची ही वृत्ती पाहून खचून न जाता पवई पोलीस ठाण्याचे शिपाई(रायटर) संदिप साळवी, फौजदार सुरज राऊत, तुषार गरूड, बीट मार्शल विनायक चव्हाण या पथकाने आपल्यापरीने, उपलब्ध साधनांसह बचावकार्य सुरू ठेवले. अग्निशमन दल येण्याआधी पवई पोलीस पथकाने सुमारे पाच ते सहा कुटुंबाना इमारतीतून सुखरूप बाहेर काढले. या धडपडीत साळवी जखमी झाले. लेक होम इमारतीशी या ना त्या कारणाने जोडल्या गेलेल्या अनेकांनी बचावकार्यात उडी घेतली होती. कोणी येथे इलेक्ट्रीशीअन म्हणून काम केले होते तर कोण ड्रायव्हर म्हणून काम करत होता. आपल्या मालकाला, ओळखीतल्यांना आगीतून सुखरूप बाहेर काढण्याच्या धडपडीत यातल्या ५ जणांचा मृत्यू झाला. इमारतीत आग लागल्यानंतर पवई पोलीस पथकाने प्रवेशद्वाराजवळ उभ्या असलेल्या किंवा बचावकार्यात अडथळा निर्माण करतील अशा रितीने पार्क केलेल्या गाडया हटविण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या होत्या. मात्र रहिवाशांनी त्याकडे दुर्लक्ष केले. उलट त्यांनी या आणीबाणीच्या परिस्थितीत पोलिसांशीच वाद घातला. रहिवाशांनी गाडया बाजुला न केल्याने इमारतीच्या प्रवेशद्वारावर धडकलेल्या अग्निशमन दलाच्या गाडया प्रवेशद्वारातून आत शिरू शकल्या नाहीत.

प्रदिप सरकार(७०), साईनाथ उर्फ अंकुश सुतार(२३), तौसीफ शेख(२८), बाबू लोहार(२६), काजल सोनी(४२), अश्विन भाटीया(५८), हिराला गुप्ता(३०) या सातजणांचा मृत्यू आगीत झाला. यापैकी सरकार, सुतार, शेख, लोहार, गुप्ता हे इमारतीबाहेरील आहेत. यापैकी गुप्ता इमारतीचा सुरक्षा रक्षक, लोहार ड्रायव्हर, सुतार-सरकार इलेक्ट्रीशीअन आणि शेख समाजसेवक होता. हे पाचही जण मानवतेचा दृष्टीकोन ठेवून मदतीसाठी इमारतीत धावले आणि त्यांचा मृत्यू झाला.

इतरांना वाचवले, पण...
नेहमीच सर्वांच्या मदतीसाठी पुढे येणार तौसिब शेखला पवई आग दुर्घटनेत मात्र कोणीही मदत केली नाही. चांदिवलीच्या मन्नुभाई चाळ येथे राहणाऱ्या या तरुणाला समाजसेवेची मोठी आवड होती. सर्वांच्या सुख-दु:खात तो नेहमीच सहभागी व्हायचा. परंतु ज्यावेळी पवईची आग लागली तेव्हा तौसिब जिममधून घरी परतत होता. मोटारसायकल घराजवळ उभी करुन तो घरात जाणार तितक्यात त्याला इमारतीमधून आगीच्या ज्वाळा निघाताना दिसल्या; आणि पुढे होत्याचे नव्हते झाले. क्षणाचाही विलंब न लावता तो या इमारतीजवळ पोहचला. काही रहिवासी १४ व्या मजल्यावर अडकल्याचे समजताच त्याने लिफ्टने १४ वा मजला गाठला.

इमारतीमधील काही जणांना घेऊन खाली आल्यानंतर त्याच इमारतीमधील एका महिलेचा मुलगा १५ व्या मजल्यावर अडकला होता. तौसिबला याची माहिती मिळताच त्याने तात्काळ तेथे पोहोचून त्या मुलाला खाली आणले. पुन्हा एकदा तो १४ व्या मजल्यावर गेला. मात्र खाली येत असतानाच लिफ्ट बंद झाली आणि त्याचा लिफ्टमध्ये गुदमरुन मृत्यू झाला. तीन मुले आणि पत्नीसह चांदिवली परिसरात राहणारा हा तरुण सर्वांसाठीच देवदुत होता. त्याच्या जाण्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रविवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Rescue of residents in death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.