Join us  

२४ तारखेपर्यंत उर्वरित गणेश मंडळांना परवाने, पालकमंत्री सुभाष देसाई यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 6:11 AM

मुंबईतील गणेशभक्तांसाठी यंदाचा गणेशोत्सव सर्व दृष्टीने सुकर होण्यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना देसाई यांनी प्रशासनाला दिल्या.

मुंबई : यंदा २७९७ गणेश मंडाळांनी परवान्यासाठी अर्ज केले असून आतापर्यंत १७७० मंडळांना परवाने देण्यात आले आहेत. उर्वरीत मंडळांना २४ तारखेपर्यंत परवाने दिले जाणार असल्याची माहिती मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. मंत्रालयात गणेशोत्सव पूर्व तयारीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुंबईतील पुलांची स्थिती, त्यावर होणारी गर्दी, जड वाहनांची वाहतूक आदीं बाबींचा आढावा घेण्यात आला.मुंबईतील गणेशभक्तांसाठी यंदाचा गणेशोत्सव सर्व दृष्टीने सुकर होण्यासाठी प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी, अशा सूचना देसाई यांनी प्रशासनाला दिल्या. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समितीचे सचिव उपनगरप्रमुख विनोद घोसाळकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त एस. वीरेश प्रभू यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.मुंबईतील २९ पुलांपैकी महापालिकेच्या ताब्यात २५ पूल आहेत. त्यात काही धोकादायक पूल आहेत. या बाबी ध्यानात घेत गर्दी, वाहतूक व्यवस्था आदींचे नियोजन करण्याच्या सूचना देसाई यांनी दिल्या. विविध चौपट्यांवर विसर्जनासाठी ६९ स्थळे निश्चित करण्यात आलेली आहेत. ३२ ठिकाणी कृत्रिम विसर्जन तलाव उभारले जाणार आहेत.याशिवाय विसर्जन मिरवणुकीचाही यावेळी आढावा घेण्यात आला. विसर्जनासाठी समुद्रात दूरपर्यंत दिसेल असा त-हेची प्रकाश व्यवस्था करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. गणेश दर्शनासाठी अनेक भाविक बोटीद्वारे समुद्रात येतात. किती बोटी आणि त्यात किती माणसे सोडायची याचेही नियोजन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

टॅग्स :सुभाष देसाई