रिक्षा परवान्यांसाठी शैक्षणिक अट शिथिल करा
By Admin | Updated: June 3, 2015 04:07 IST2015-06-03T04:07:42+5:302015-06-03T04:07:42+5:30
रिक्षा परवान्यांसाठी दहावी उत्तीर्ण असणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र ही अट जाचक असल्याने अनेकांना रिक्षा परवान्यांपासून वंचित राहावे लागत आहे.

रिक्षा परवान्यांसाठी शैक्षणिक अट शिथिल करा
नवी मुंबई : रिक्षा परवान्यांसाठी दहावी उत्तीर्ण असणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र ही अट जाचक असल्याने अनेकांना रिक्षा परवान्यांपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे दहावी उत्तीर्ण अट शिथिल करून ती आठवी उत्तीर्ण अशी करावी, अशा आशयाचे पत्र ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी आरटीओला दिले आहे. आमदार नाईक यांनी आज आरटीओ अधिकारी संजय धायगुडे यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली.
नवी मुुंबईत अनेक चालक रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत. मात्र विनापरवाना रिक्षांमुळे त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. जे रिक्षा चालक जवळचे भाडे नाकारतात, प्रवाशांबरोबर विनाकारण हुज्जत घालत बसतात, अशा रिक्षा चालकांच्या विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. आरटीओ, रिक्षा संघटना
आणि सामाजिक संघटना यांच्या माध्यमातून जनजागृती अभियान राबविण्याची सूचनाही त्यांनी आरटीओला केली.
नवी मुंबईत स्वतंत्र कार्यालयाचा प्रस्ताव आरटीओने शासनाकडे सादर केला आहे मात्र तो अद्याप मंजूर झालेला नाही. हा प्रस्ताव लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन आ. नाईक यांनी आरटीओच्या अधिकाऱ्यांना दिले. आरटीओच्या एपीएमसी आवारातील कार्यालयातील गैरसोयींची माहिती करुन घेतली. आरटीओ कार्यालयात सेवा - सुविधांच्या पूर्ततेसाठी शासनाकडे प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, शासनाच्या आदेशाप्रमाणे २६८१ रिक्षा परवाने देण्यात येणार आहेत त्यापैकी २००० रिक्षा परवाने आत्तापर्यंत देण्यात आले आहेत. परवान्यांच्या प्रतीक्षा यादीत असणाऱ्या रिक्षा चालकांसाठी १०वी उत्तीर्णऐवजी ८वी उत्तीर्ण ही अट ठेवावी, अशी मागणी आमदार नाईक यांनी केली आहे. या मागणीबाबत शासनास कळविण्यात येईल, असे संजय धायगुडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)