Join us  

रेखा जरे हत्याकांड: बाळ बोठेने वेषांतर केलं, हॉटेलच्या रुमला बाहेरुन कुलुप लावलं; पण त्यांनी तोंड उघडलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 1:05 PM

रेखा जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव फाटा येथे दोघा मारेकर्‍यांनी गळा चिरून हत्या केली होती.

अहमदनगर: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे (Bal Bothe) याला अखेर नगर पोलिसांनी शनिवारी पहाटे हैदराबाद येथून जेरबंद केले. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. गेल्या साडेतीन महिन्यांपासून बोठे पोलिसांना गुंगारा देत होता.

रेखा जरे यांची ३० नोव्हेंबर रोजी नगर-पुणे महामार्गावरील जातेगाव फाटा येथे दोघा मारेकर्‍यांनी गळा चिरून हत्या केली होती. या घटनेनंतर पोलिसांनी अवघ्या दोनच दिवसांत मारेकऱ्यांसह पाच आरोपींना जेरबंद केले. हत्येची सुपारी देणारा मुख्य सूत्रधार बोठे मात्र फरार होता. पोलीस पथके त्याचा चौफेर शोध घेत होते. अखेर त्याला हैद्राबाद येथून अटक झाली. 

आरोपी बाळ बोठे हा  तब्बल ८२ दिवसांपासून वेषांतर करून हैदराबादमध्ये लपला होता. पोलिसांनी मिळालेल्या माहितीनुसार छापे टाकले. त्यामध्ये तिघे हाती लागले. त्यांच्याकडून अधिक माहिती मिळाली आणि बोठेही पोलिसांच्या हाती लागला. त्यामुळे पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत कौतुक होत आहे.

मुख्य सूत्रधार बाळ बोठे एका हॉटेलमध्ये लपला होता. बाळ बोठे ज्या हॉटेलमध्ये लपला होता, त्या खोलीस बाहेरून कुलुप होते. हैदराबादमध्ये उस्मानिया विद्यापीठातील अँड. जनार्दन चंद्राप्पा याने बोठेस आश्रय दिला होता. तर अहमदनगर येथून महेश वसंतराव तनपुरे हा बाळ बोठेच्या संपर्कात होता. 

तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी पाच दिवस बिलालनगर परिसरात बोठेचा शोध घेतला. यापुर्वी दोन ते तीन वेळा पोलिसांना गुंगारा देण्यात बोठे यशस्वी झाला होता. मात्र यावेळी तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. मुबंई पोलिस व हैदराबाद पोलिसांच्या मदतीने अहमदनगर पोलिसांनी बोठे  यास अटक केली. आज सायंकाळपर्यत नगरमध्ये आणल्यानंतर पारनेर न्यायालयात त्यास हजर केला जाणार आहे.

नेमकं प्रकरण काय?

रेखा भाऊसाहेब जरे यांची ३० नोव्हेंबरला हत्या झाली होती. राजकीय क्षेत्रातील महिलेची भरदिवसा भररस्त्यात कुटुंबीयांसमोर हत्या झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या असल्यामुळे रेखा जरे हत्या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं.

रेखा जरे कुटुंबियांसह स्वतःच्या गाडीने सोमवारी संध्याकाळी पुण्याहून अहमदनगरकडे येत होत्या. यावेळी त्यांच्यासोबत मुलगा आणि त्यांची आईही होती. कारची काच बाईकला लागल्याचं सांगत दोन दुचाकीस्वारांनी जरे मायलेकाशी वाद घातला आणि रेखा जरे यांच्या मानेवर धारदार शस्त्राने वार करत त्यांची हत्या करण्यात आली.

अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात हा प्रकार घडला होता. हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने रेखा जरे यांच्यावर वार केले. या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

अहमदनगर पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत ३ दिवसांमध्ये सर्व आरोपींना अटक केली आहे. तसेच मुख्य सूत्रधाराचाही शोध घेतला आहे. सुरुवातीला ‘रोड रेज’मधून झालेल्या वादातून रेखा जरे यांची हत्या झाल्याचं भासवण्यात आलं होतं. परंतु आरोपींनी सुपारी घेतल्याची कबुली दिल्याने हत्येचा कट उघड झाला. 

टॅग्स :अटकअहमदनगरपोलिस