प्रकल्पग्रस्तांचा इतिहासही दुर्लक्षितच

By Admin | Updated: June 7, 2015 00:06 IST2015-06-07T00:06:48+5:302015-06-07T00:06:48+5:30

सिडको कार्यक्षेत्रामधील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याकडे शासनाने नेहमीच दुर्लक्ष केले आहे. संघर्ष केल्याशिवाय एकही सुविधा त्यांना मिळालेली नाही.

Regarding the history of project-affected people | प्रकल्पग्रस्तांचा इतिहासही दुर्लक्षितच

प्रकल्पग्रस्तांचा इतिहासही दुर्लक्षितच

नामदेव मोरे, नवी मुंबई
सिडको कार्यक्षेत्रामधील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याकडे शासनाने नेहमीच दुर्लक्ष केले आहे. संघर्ष केल्याशिवाय एकही सुविधा त्यांना मिळालेली नाही. भूमिपुत्रांची प्रतिमा मलिन करण्यासाठीही जाणीवपूर्वक प्रयत्न होवू लागले आहेत. स्वातंत्र्य लढ्यापासून ते प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी केलेल्या आंदोलनापर्यंतचा इतिहासही दुर्लक्षित ठेवला जात आहे. घणसोलीतील स्वातंत्र्यसैनिकांचे व चिरनेर आंदोलनामध्ये हुतात्मा झालेल्या भूमिपुत्रांची स्मारकेही उपेक्षित आहेत.
नवी मुंबई, पनवेल, उरणमधील प्रकल्पग्रस्तांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. सिडको व शासनाविरोधातील असंतोष वाढू लागला असून येथील ग्रामस्थ पुन्हा एकदा निर्णायक आंदोलन उभारण्याची तयारी करू लागले आहेत. शासन प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सोडविण्याकडे दुर्लक्ष करत असताना दुसरीकडे त्यांची प्रतिमाही मलिन करण्याचे काम सुरू आहे. गाववाला म्हणजे भांडखोर अशी प्रतिमा तयार केली जात आहे. भूमिपुत्रांचा इतिहास व कर्तृत्व समाजासमोर येवू न दिल्यामुळे हे प्रकार घडू लागले आहेत. घणसोलीमधील नागरिकांनी स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. सिडकोने प्रत्येक राज्याच्या भवनसाठी जागा दिली. परंतु घणसोलीतील स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकासाठी एक गुंठाही जागा दिलेली नाही. स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतलेल्यांचे नाव कोणत्याही मोठ्या वास्तूला देण्यात आलेले नाही. गावातील मंदिरासमोरील दहा फूट जागेत छोटेसे स्मारक तयार करण्यात आले आहे. एवढी उपेक्षा देशात कोणत्याच स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मारकाची झालेली नाही. चिरनेरच्या २५ सप्टेंबर १९३० मध्ये झालेल्या जंगल सत्याग्रहामध्येही १३ जणांनी हौतात्म्य पत्करले होते. परंतु त्यांचेही नाव कोणत्याच वास्तूला दिलेले नाही.
शासनाने प्रकल्पासाठी जमीन संपादित केली की त्याला शेतकरी विरोध करतात. आंदोलन सुरू होते. परंतु नवी मुंबईमधील भूमिपुत्रांनी केलेल्या आंदोलनाने नवीन इतिहास निर्माण केला. भूसंपादनाविरोधात जासईजवळील दास्तान येथे जानेवारी १९८४ मध्ये झालेल्या आंदोलनामध्ये पाच जणांना हौतात्म्य पत्करावे लागले व ३८ जण गंभीर जखमी झाले. यानंतर शासनाने संपादित जमिनीपैकी साडेबारा टक्के जमीन परत दिली. शेतकऱ्यांच्या हितासाठी बलिदान दिलेल्या या हुतात्म्यांचे स्मारकही अद्याप सिडकोने बांधलेले नाही.

भव्य स्मारक हवे
-प्रकल्पग्रस्तांच्या हितासाठी लढा देणाऱ्या दि.बा. पाटील यांचेही अद्याप भव्य स्मारक उभारण्यात आलेले नाही. जासई गावातील शाळेत एक पुतळा उभारण्यात आला आहे.
- दि.बा. पाटील, दास्तानमधील लढ्यात शहीद झालेले भूमिपुत्र, चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्मे, घणसोलीमधील स्वातंत्र्यसैनिक यांचे भव्य स्मारक शहरात झाले पाहिजे.
-त्यांनी केलेल्या कर्तृत्वाची माहिती भावी पिढीला समजली पाहिजे. शहरातील एक्झिबिशन सेंटर, गोल्फ कोर्स, सेंट्रल पार्क, येवू घातलेले विमानतळ व इतर मोठ्या प्रकल्पांना कर्तृत्ववान भूमिपुत्रांचीच नावे दिली जावीत.
-भूमिपुत्रांच्या कर्तृत्वाची माहिती शहरात आलेल्या सर्वांना उपलब्ध झाली पाहिजे. परंतु शासन, सिडको, महापालिका सर्वांकडून याकडे दुर्लक्ष होत असून यासाठीही भूमिपुत्रांना लढा उभारण्याची वेळ आली आहे.

Web Title: Regarding the history of project-affected people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.