Join us  

'सत्तेत तुम्ही होता, रझाकारांची औलाद नाही, मग मराठवाडा मागास का?'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 9:20 AM

संपूर्ण मराठवाड्यात 17 सप्टेंबर हा दिवस मराठावाडा मुक्तीसंग्राम आणि हैदराबाद मुक्तीसंग्राम म्हणून साजरा करण्यात येतो.

मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलिल यांच्यावर जबरी टीका केली होती. तसेच जलिल यांच्या ध्वजारोहण सोहळ्याच्या गैरहजेरीनंतर औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही जलिल यांच्यावर टीका केली. हैदराबादमधून इकडे आले, एमआयएमच्या नावानं आले, दंगली घडवू लागले. ते रझाकाराचीच औलाद आहेत, म्हणूनच ते ध्वजारोहण सोहळ्याला इकडे आले नाहीत, अशा शब्दात चंद्रकांत खैरे यांनी जलिल यांच्यावर आगपाखड केली होती. जलिल यांनी आपल्या अनुपस्थितीचे कारण सांगत, शिवसेना आणि खैरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. तसेच, मी पुढील वर्षी माझ्याहस्ते ध्वजारोहण करा, मी येईन, असेही जलिल यांनी म्हटलंय.  

संपूर्ण मराठवाड्यात 17 सप्टेंबर हा दिवस मराठावाडा मुक्तीसंग्राम आणि हैदराबाद मुक्तीसंग्राम म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त ध्वाजारोहणही करण्यात येते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते औरंगाबादेत ध्वजारोहण करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार इम्तियाज जलिल अनुपस्थित राहिले होते. विशेष म्हणजे आमदार झाल्यानंतर गेल्या 4 वर्षांपासून ते या कार्यक्रमाला एकदाही हजर राहिले नाहीत. त्यामुळे औरंगाबादचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि उद्धव ठाकरे यांनी जलिल यांच्यावर टीका करताना, ते रझाकाराची औलाद आणि निजामाचे गुलाम असे म्हटले होते. जलिल यांनी यास उत्तर देताना, शिवसेनेवर टीका केली. 

केवळ 1 दिवस झेंडा हातात घ्यायचा अन् मराठवाडामराठवाडा करायंचं. काय केलं तुम्ही इतक्या वर्षांत मराठवाड्याच्या विकासासाठी?. आज मराठवाडा मागास आहे, तो यांच्यासारख्या नेत्यांमळेच. मला शिव्या घालणाऱ्यांना मी हा प्रश्न विचारतो. मराठवाडा इतका मागास का आहे?. सत्तेत तुम्ही होता, रझाकारांची औलाद नाही, असे म्हणत जलिल यांनी शिवसेना आणि खैरे यांना लक्ष्य केले. तसेच माझ्यासाठी का आला नाही किंवा आला हा मुद्दा गौण आहे. विकासाचे मुद्दे माझ्यासाठी महत्त्वाचे आहेत. पुढील वर्षी मुख्यमंत्र्यांना बोलावू नका, मला बोलवा. मी येतो ध्वजारोहणाला. माझ्या हस्ते ध्वजारोहण करा, असे इम्तियाज जलिल यांनी म्हटले आहे.

औरंगाबाद जिल्ह्याच्या विकासासंदर्भात माझी खूप महत्त्वाची बैठक मुंबईत होती. औरंगाबाद आणि शिर्डीच्या दरम्यानचा जो रस्ता आहे, त्या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. तो, रस्ता सुधारण्यासाठी मी एक प्रपोजल तयार केलंय, जे घेऊन मी तिथं गेलो होते. तेथील सचिवासोबत माझी मिटिंग होती. पंचंगीच्या गेटसाठी निधी आणण्यासाठी गेलो होतो आणि तो निधी मी घेऊन आलो, असं स्पष्टीकरण इम्तियाज जलील यांनी मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या कार्यक्रमान अनुपस्थित राहिल्यानंतर दिलंय.  

टॅग्स :इम्तियाज जलीलशिवसेनाचंद्रकांत खैरेमराठवाडामुंबई