Join us  

मनसे महाअधिवेशन : ''मराठी भाषा, अस्मितेसाठी राज ठाकरेंनी 100हून अधिक केसेस अंगावर घेतल्या"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 11:09 AM

बाळासाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून गोरेगावच्या नेस्को कॉम्प्लेक्समध्ये मनसेनं महाअधिवेशनाचं आयोजन केलं आहे.

ठळक मुद्दे बाळासाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून गोरेगावच्या नेस्को कॉम्प्लेक्समध्ये मनसेनं महाअधिवेशनाचं आयोजन केलं आहे.या अधिवेशनात राज ठाकरेंनी आपल्या झेंड्याचं अनावरण केलं.पक्ष स्थापन झाल्यानंतर आपल्या अनेक संघटना स्थापन झाल्या, प्रत्येक संघटनेनं उल्लेखनीय अशी कामं केलेली आहेत. 

मुंबईः बाळासाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून गोरेगावच्या नेस्को कॉम्प्लेक्समध्ये मनसेनं महाअधिवेशनाचं आयोजन केलं आहे.  या अधिवेशनात राज ठाकरेंनी आपल्या झेंड्याचं अनावरण केलं. त्यानंतर मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी उपस्थितांना संबोधित केलं आहे. पक्ष स्थापन झाल्यानंतर आपल्या अनेक संघटना स्थापन झाल्या, प्रत्येक संघटनेनं उल्लेखनीय अशी कामं केलेली आहेत. 

पक्ष फक्त 13 वर्षांचा आहे, पण जनतेच्या राज ठाकरे आणि आपल्याकडून प्रचंड जास्ती अपेक्षा आहेत. मराठी भाषा, अस्मिता आणि संस्कृतीसाठी 100हून अधिक केसेस राज ठाकरेंनी अंगावर घेतल्या आहेत. कुठल्याही विषयावर राज ठाकरेंनी नेहमीच कठोर भूमिका घेतलेली आहे. कायद्याच्या कचाट्यात अडकलेले आपले सण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमुळेच निडरपणे साजरे झाले. आजवर पक्षाने अनेक स्थित्यंतरं पाहिली, अनेक निर्भीड राजकीय भूमिका घेतल्या, तडफेने आंदोलनं केली. जेट कर्मचाऱ्यांना न्याय देणारं आंदोलन, मराठी चित्रपटांना हक्काचं स्थान चित्रपटगृहांत मिळवून दिलं, आझाद मैदानावर धर्मांधांनी जेव्हा धुडगूस घातला, तेव्हा बेधडकपणे आपण मोर्च्याने त्याला उत्तर दिलं होतं, असं म्हणत अभ्यंकर यांनी राज ठाकरेंवर स्तुतिसुमनं उधळली होती.  

आमचे जे जे लोकप्रतिनिधी निवडून आले त्यांनी उत्कृष्ट कामं केली. उदाहरण द्यायचं झालं तर नेते बाळा नांदगावकर ह्यांचं देता येईल. सर्वाधिक प्रश्न विचारून पाठपुरावा करणारा आमदार म्हणून सलग 4 वर्ष अनेक संस्थांनी त्यांची पाठ थोपटली, असं म्हणत अभ्यंकरांनी बाळा नांदगावकरांचंही कौतुक केलं.  25-25 वर्ष सत्ता असूनही जे इतर शहरांमध्ये झालं नाही ते आपण नाशिकमध्ये संधी मिळाल्यानंतर केलं. बोटॅनिकल गार्डन, पाणीपुरवठा योजना, 510 किमीचे रस्ते, संग्रहालय ही विकासकामं पाहिलीत तर तुम्हाला कळेल कि नवनिर्माण म्हणजे काय?", नीटच्या परीक्षेतही राज ठाकरेंनी मुलांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. नाशिकचं नवनिर्माण लोकांवर कुठलाही कर न लावता केलं. नाशिकमध्ये हजार ते 1200 कोटी रुपयांचे रस्ते केले. नाशिकमध्ये खड्ड्याचं टेंडर पाच वर्षांच्या काळात निघालं नाही. आशिया खंडातील उत्तम असं बोटॅनिकल गार्डन राज ठाकरेंच्या प्रयत्नांनी झालं. बाळासाहेबांच्या नावानं उत्कृष्ट असा ग्रंथसंग्रहालय उभा राहिला. राज ठाकरेंनी हे सर्व पाच वर्षांत केलं, असंही अविनाश अभ्यंकर म्हणाले आहेत. 

टॅग्स :मनसेराज ठाकरे