Join us  

सुधारित नागरिकत्व कायद्यावर राज ठाकरेंनी केलं भाष्य; मोदी सरकारवर साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 6:02 PM

आंदोलन, जाळपोळ, दंगली हे त्यांना हवेच आहे आणी जे त्यांना हवे आहे ते आपण का करावे?

मुंबई - गेल्या काही दिवसांपासून सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसी मुद्द्यावरुन देशभरात वादंग पेटलं असताना अल्पसंख्याक समुदायाच्या शिष्टमंडळाने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली. राज यांच्या कृष्णकुंज निवासस्थानी अल्पसंख्याक धर्मगुरू ,विचारवंत आणि पक्षातील अल्पसंख्याक समाजातील पदाधिकारी यांच्या सोबत सध्या देशात  CAB व NRC विषयात चाललेल्या घडामोडी संबंधी चर्चा केली. यावेळी राज ठाकरेंनी उपस्थितांना संयम ठेवण्याचं आवाहन केलं. 

या बैठकीत राज ठाकरे म्हणाले की, "सरकारला जे हवे आहे ते करू नका, सरकारला मंदी वरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी ह्या गोष्टी घडवून आणायच्या आहेत. आंदोलन, जाळपोळ, दंगली हे त्यांना हवेच आहे आणी जे त्यांना हवे आहे ते आपण का करावे? असा सवाल त्यांनी चर्चेत उपस्थित केला. 

तसेच सरकार किती लोकांना अटक करु शकते? अख्या देशाला कैदेत ठेवणार का? म्हणून सांगतो, ते काहीच करू शकणार नाहीत, तितकी यंत्रणा ही नाही म्हणून संयम ठेवा! असं आवाहन राज ठाकरेंनी बैठकीत अल्पसंख्याक समुदायाला केलं. 

दरम्यान, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनास दिल्लीत मंगळवारी हिंसक वळण लागले. सीलमपूर भागात आंदोलकांनी पोलिसांवर तुफान दगडफेक केल्याने पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. तब्बल दोन तासांनी तो भाग शांत झाल असला, तरी तिथे तणाव होता. आंदोलकांनी दोन दुचाकी जाळल्या, तर पोलीस चौकी पेटवून दिली. शांततेत मोर्चा सुरू असताना गर्दीतून पोलिसांवर दगडफेक सुरू झाली. काही आंदोलकांनी पोलिसांना मारहाण सुरू केली. त्यामुळे पोलिसांनी अश्रुधुराचा वापर केला. नंतर ड्रोनद्वारे पाहणी करून पोलिसांनी काही जणांना ताब्यातही घेतले. या भागात गस्त घालण्यास सुरुवात केली. जमावाने दोन दुचाकी पेटवून दिल्या. पोलीस चौकीही जाळली. नंतर सात मेट्रो स्थानके काही काळ बंद ठेवण्यात आली होती. सीलमपूर चौकात मोर्चा येताच पोलिसांनी त्यांना पुढे जाण्यास मज्जाव केला. त्यामुळे आंदोलकांनी दगडफेक सुरू केली. नागरिकत्व कायदा, एनआरसीचा विरोध करणारे फलक लोकांच्या हाती होते. केरळमध्ये बंदमध्येही आज हिंसाचार झाला. निदर्शकांनी अनेक बसेस जाळल्याचे वृत्त आहे. 

टॅग्स :नागरिकत्व सुधारणा विधेयककेंद्र सरकारभाजपाराज ठाकरेमुस्लीम