Join us
Daily Top 2Weekly Top 5

दुकानदारी बंद पडल्यानेच राज ठाकरेंचं फ्रस्टेशन, मुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 15:20 IST

राज ठाकरेंनी सोलापूरच्या सभेत भाजपा सरकारची पोलखोल केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंच्या प्रश्नावर उत्तरे दिली.

मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या आरोपांवर उत्तर देताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली. स्वत:च्या काकाशी प्रामाणिक राहिले असते, तर दुसऱ्याच्या काकाची सुपारी घ्यायची वेळ आली नसती. अख्ख्या महाराष्ट्राला माहितीय, राज ठाकरेंनी कुणाची सुपारी घेतलीय ते. दुकानदारी बंद पडल्यानेच ते फ्रस्टेशन काढत आहेत, अशा शब्दात मुख्यमत्र्यांनी राज ठाकरेंवर गंभीर आरोप केला आहे.   

राज ठाकरेंनी सोलापूरच्या सभेत भाजपा सरकारची पोलखोल केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंच्या प्रश्नावर उत्तरे दिली. लोकांना शहाणपणा शिकविण्यापेक्षा तुम्ही काय केलं ते सांगा? तुमच कर्तृत्व काय? लोकांनी तुम्हाला का नाकारलं याचा विचार करा. केवळ चांगलं भाषण करता येतं म्हणजे झालं असं नाही. घरात बसून तेंडुलकरने फुलटॉस असाच खेळायला पाहिजे होते, तसाच खेळायला पाहिजे होता, हे सांगण सोपं असतयं. पण, प्रत्यक्ष मैदानात येऊन खेळायला, हवं. राज ठाकरे हे रिटार्यट असून ते आता कॉमेंट्रीमनची भूमिका बजावत आहेत, माहिती नाही यांना मानधन मिळतंय की नाही, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे.  

तसेच डीजिटल हरीसाल गावच्या जाहिरातीतील मुलाबाबतची दुसरी बाजूही मुख्यमंत्र्यांनी मांडली आहे. राज ठाकरे 4 वर्षांपूर्वी कधी हरिसालला गेले होते का?. आम्ही त्या मुलाला मॉडेल म्हणून घेतलं नाही. गावातील त्या मुलानेच तिथे गेलेल्या टीमला स्वत: गाव दाखवलं. गावात काय काय बदल झाले, परिवर्तन झालं हे त्या मुलानेच त्या टीमला दाखवलं. मी त्याचे व्हीडिओही तुम्हाला देऊ शकतो, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या सोलापूरच्या सभेतील मुद्दा खोडून काढला आहे. 

राज ठाकरेंची दुकानदारी बंद पडल्याने ते फ्रस्टेशन काढत आहेत. राज ठाकरेंची अवस्था ही क्रिकेटमधील रिटायर्ड कॉमेंट्रीमन सारखी आहे. त्यामुळेच भाजपा आणि मोदींना ते लक्ष्य करत आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले. तसेच हरिसालविषयी बोलताना, 4 वर्षांपूर्वीच हरिसाल वेगळं होतं आणि आज पाहाल तर हरिसाल वेगळं आहे. हरिसालमध्ये कुठलेही 4 जी टॉवर बसविण्यात आलेले नाही. ते गाव डिजीटल करण्यासाठी एक वेगळीच तंत्रप्रणाली वापरण्यात आली आहे.  

व्हाईटस्पेस नावाची नवीन टेक्नॉलॉजी पावरण्यात आली आहे. टीव्हीच्या लहरींप्रमाणे स्पेक्ट्रमच्या माध्यमातून तेथे इंटरनेट सेवा पुरविण्यात आली असून त्याप्रमाणे हे गाव डिजीटल बनविण्यात आले आहे. त्यामुळे राज ठाकरेंना या बाबी माहिती नसून केवळ मुंबईतील दादरला बसून हरिसाल समजत नसतं, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिले आहे. तसेच गावातील त्या मुलासंदर्भात बोलायचं झाल्यास, हे सांगतात हा मुलगा पुण्यात सापडला. आता, राजकारण करायचं म्हटल्यावर हे शक्य आहे. आणि गावाकडचा एखादा मुलाग नोकरीसाठी पुणे, मुंबईकडे येत असेल तर त्यात गैर काय ? असे फडणवीस यांनी म्हटलं आहे. गावात किमान वेतनाची काम आम्ही देत आहोत. पण, त्या गावात इंडस्ट्री तर उभी करू शकत नाही, निदात हे तरी समजायला हवं. केवळ, फ्रस्टेशन काढण्यसाठी राज ठाकरेंकडून ही दिशाभूल होत आहे. त्यामुळे, राज ठाकरेंना आम्ही महत्व देत नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीसराज ठाकरेमहाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019डिजिटलशरद पवार