पावसाने नेम पाळला...!
By Admin | Updated: June 6, 2015 23:05 IST2015-06-06T23:05:24+5:302015-06-06T23:05:24+5:30
अपवाद वगळता पाऊस सात जूनला हजेरी लावतोच लावतो. हाच नेम पाळत यंदाही ठाणे जिल्ह्यातील बहुतांशी भागांत शनिवारी पहाटे

पावसाने नेम पाळला...!
पहिल्या दिवशी २३.९० मिमीची नोंद : जिल्ह्यात गडगडाटात पाऊस; अनेक भागांत वीजपुरवठा खंडित
ठाणे : अपवाद वगळता पाऊस सात जूनला हजेरी लावतोच लावतो. हाच नेम पाळत यंदाही ठाणे जिल्ह्यातील बहुतांशी भागांत शनिवारी पहाटे एक दिवस आधीच विजेच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटात वरुणराजाचे जोरदार आगमन झाले. या कालावधीत ठिकठिकाणी वीजपुरवठा खंडित झाल्याने पहाटेच्या पाणीपुरवठ्यात व्यत्यय आला. जिल्ह्यात सुमारे २३.९० मिमी एकूण पाऊस पडल्याची नोंद करण्यात आली असून सरासरी ३.४१ मिमी पावसाची नोंद झाल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले. तर आठवडाभरापासून ढगाळ वातावरण असल्याने शेतीच्या मशागतीच्या कामांनी वेग घेतला आहे.
उल्हासनगर, कल्याण, अंबरनाथ, भिवंडी, शहापूर आणि मुरबाड या तालुक्यांच्या बहुतांशी भागांत शनिवारी पहाटेच्या सुमारास पाऊस पडला. प्रारंभीच पडलेल्या या पावसाच्या कालावधीत आकाशात विजेचा लखलखाट व ढगांचा गडगडाट ऐकायला मिळाला. यादरम्यान ठिकठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता. यामुळे शहारात दीर्घकाळ पाणीपुरवठा करणे शक्य झाले नाही. उल्हासनगर शहरात आधीच २४ तासांपासून पाणीपुरवठा बंद असतानाच पावसामुळे वीजपुरवठा बंद झाल्याने सकाळच्या कालावधीत दीर्घकाळानंतर शहरात पाणीपुरवठा सुरळीत झाला. पण, तोही अल्प काळ राहिल्यामुळे बहुतांशी नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागले.
मुरबाड तालुक्यात याआधीच अवेळी पावसाने धुमाकूळ घातलेला होता. पण, जून महिन्यात प्रथमच हा मानसूनचा पाऊस पडला असता शेतकऱ्यांमध्ये लगबग सुरू झाली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीचा पहिला पाऊस २३.९० मिमी झाला असून गेल्या वर्षी आजच्या दिवशी जिल्ह्यात ७.४० मिमी पाऊस झाला.