मुंबईकरांवर जलवर्षाव; पाणीपुरवठ्यासाठी भरघोस तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:34 IST2021-02-05T04:34:16+5:302021-02-05T04:34:16+5:30
२०० दशलक्ष लीटरचा नि:क्षारीकरण प्रकल्प, भविष्यकालीन वाढीव गरजा ४०० दशलक्ष लीटर क्षमतेसह बांधण्यात येणार आहे. हे काम सप्टेंबर २०२१ ...

मुंबईकरांवर जलवर्षाव; पाणीपुरवठ्यासाठी भरघोस तरतूद
२०० दशलक्ष लीटरचा नि:क्षारीकरण प्रकल्प, भविष्यकालीन वाढीव गरजा ४०० दशलक्ष लीटर क्षमतेसह बांधण्यात येणार आहे. हे काम सप्टेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होईल. याकामी ५ लाखांची तरतूद आहे. मध्य वैतरणा धरण येथे २० मेगावॉट क्षमतेचा जलविद्युत प्रकल्प व ८० मेगावॉट क्षमतेचा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प यांचा अंतर्भाव असलेला संकरीत अक्षय ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. शिवाय धरणे आणि तलावांत सौरऊर्जा प्रकल्प राबविण्यात येतील. मोडक सागर आणि इतर तलावांमध्ये निर्माण होणारी हरित ऊर्जा म्हणजे २०० दशलक्ष लीटर नि:क्षारीकरण प्रकल्पासाठी त्याची वाढीव क्षमता लक्षात घेता वापरण्याचे नियोजन आहे.
चेंबूर ते वडाळा आणि पुढे परेलपर्यंतचा जलबोगदा एप्रिल २०२६ मध्ये पूर्ण होईल. अमर महल ते ट्रॉम्बे जलाशयापर्यंतचा जलबोगदा ऑक्टोबर २०२४ पर्यंत पूर्ण होईल. बाळकुम ते मुलुंडदरम्यान जलवहन बोगद्यासाठी सल्लागारांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्व जलवहन बोगद्यांच्या कामासाठी ३१९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. मलबार टेकडी जलाशयाच्या संरचनात्मक दुरुस्तीसाठी ८ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
जलवाहिन्यांचे पुनर्वसन, पुनर्स्थापना आणि नव्या जलवाहिन्यादेखील टाकण्यात येणार आहेत. चिंचवली ते येवई दरम्यान ३ हजार मिमी व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू असून, सप्टेंबर २०२१पर्यंत हे काम पूर्ण होईल. बाळकुम ते सॅडल टनेलदरम्यान ३ हजार मिमी व्यासाच्या मुख्य वाहिनीचे काम सप्टेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होईल. भांडुप अँकर ते मरोशी गेटदरम्यान २ हजार ४०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीचे काम जून २०२२ पर्यंत पूर्ण होईल. भांडुप संकुल येथे जलबोगद्याच्या कुपकापासून १ हजार ९१० दशलक्ष लीटर जलप्रक्रिया केंद्रापर्यंत ४ हजार मिमी व्यासाच्या अंतर्गत जलवाहिनी जोडण्याचे काम सुरू आहे. मरोशी ते सहार गाव दरम्यान २ हजार मिमी व्यासाची जलवाहिनी टाकण्यासाठी निविदा मागविण्यात येणार आहेत. या जलवाहिन्यांच्या कामासाठी २१३ कोटींची तरतूद आहे. विहार धरणांतून ओसंडून वाहणाऱ्या पाण्याचे भांडुप जलशुध्दीकरण केंद्रात वहन करण्यासाठी ७० लाखांची तरतूद आहे.