प्रचार शिगेला, निवडणूक यंत्रणा कामाला
By Admin | Updated: June 6, 2015 23:12 IST2015-06-06T23:12:59+5:302015-06-06T23:12:59+5:30
हळुहळू प्रचाराचा जोर वाढू लागला आहे. मतदारयादीतील गोंधळामुळे मतदानाच्या दिवशी मतदारांची चांगलीच फरफट होण्याची भीती व्यक्त होत आहे.

प्रचार शिगेला, निवडणूक यंत्रणा कामाला
दीपक मोहिते, वसई
हळुहळू प्रचाराचा जोर वाढू लागला आहे. मतदारयादीतील गोंधळामुळे मतदानाच्या दिवशी मतदारांची चांगलीच फरफट होण्याची भीती व्यक्त होत आहे. अशाही परिस्थितीत साऱ्या राजकीय पक्षांनी आपले सर्वस्व पणाला लावले आहे. प्रत्यक्ष भेटीवर उमेदवारांनी भर दिला आहे. विशेष म्हणजे, काही राजकीय पक्षांचे बाहेरगावचे कार्यकर्तेही येथे प्रचारासाठी दाखल झाले आहे. निवडणूक यंत्रणेनेही तयारी सुरु केली आहे.
आता प्रचार करण्यासाठी केवळ ६ दिवस उरल्यामुळे अधिकाधिक मतदारांना भेटण्यावर उमेदवारांचा भर आहे. पालिकेच्या निवडणुकीतील प्रचाराचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. शुक्रवारी सेनेची जाहीर सभा झाली. त्या सभेत सेना नेत्यांनी स्थानिक राजकीय नेत्यांवर चांगलेच तोंडसुख घेतले. यासंदर्भात लवकरच निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे समजते.
दिवसभर मतदारांच्या भेटीगाठी घेणे व संध्याकाळी रस्त्याच्या एका कोपऱ्यात चौकसभा लावणे अशा पद्धतीने प्रचार सुरु आहे. भाजपनेही आपल्यापरीने प्रचार सुरू केला असून त्यांच्याही प्रचाराचा भर प्रत्यक्ष मतदारांची भेट घेण्यावर आहे. मतदारयादीप्रमाणे मतदार शोधणे शक्य होत नसल्यामुळे उमेदवारासह कार्यकर्त्यांची मात्र चांगलीच दमछाक होत आहे. प्रचार सुरू असतानाच पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची दुसरी फळी मतदान व मतमोजणीच्या दिवशी लागणाऱ्या कार्यकर्त्यांची जुळवाजुळव तसेच साहित्याची उपलब्धता आदी कामे हातावेगळी करण्यात गुंतली आहेत.
निवडणूक शाखेने मतदान आणि मतमोजणी सुरळीत व्हावी म्हणून प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली आहेत. १११ प्रभागापैंकी किती मतदानकेंद्रे अतिसंवेदनशील व संवेदनशील आहेत याचा आढावा लवकरच घेण्यात येणार आहे. त्यादृष्टीने निवडणूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी पोलीस यंत्रणांना सूचना दिल्या आहेत. १३ तारखेला सायंकाळी कर्मचारी व साहित्य प्रत्येक प्रभागातील मतदानकेंद्रावर पाठवण्यात येणार आहे. यादोन्ही दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता पोलिसांची अधिक कुमक जिल्ह्यातून मागविण्यात येणार आहे. एकुण ७ लाख मतदार १११ नगरसेवक निवडणार आहेत. ११५ जागापैकी बिनविरोध झाल्यामुळे आता केवळ १११ प्रभागातच निवडणूक होत आहे. शुक्रवारी मध्यरात्री पावसाने हजेरी लावल्याने या निवडणुकांवर पावसाचे सावट आहे. मतदानाच्या दिवशी पाऊस झाल्यास मतदानाची टक्केवारी घसरेल, अशी भीती राजकीय पक्षांमधून व्यक्त होत आहे. शुक्रवारी रात्री कोसळलेल्या पावसामुळे शनिवारी सकाळी महावितरणच्या कारभाराचा बोजवारा उडाला. अनेक भागातुन वीज गायब झाली. अशी परिस्थिती मतदानाच्या दिवशी घडु नये, याकरिता योग्य ती खबरदारी घेण्यात येणार असल्याचे निवडणूक सुत्रांनी सांगितले. दरम्यान पोलीस यंत्रणेने परवानाधारक शस्त्रधारकांकडून शस्त्रे जमा करण्याच्या कामास सुरूवात केली आहे. तर दुसरीकडे अनेक गुंडांवर हद्दपारीच्या नोटीसाही बजावण्यात आल्या आहेत. निवडणूक यंत्रणा व पोलीस प्रशासन निवडणुकीदरम्यान कोणतीही अप्रिय घटना घडु नये यासाठी विशेष उपाययोजना करीत आहे.
मतदानाच्या दिवशी पावसाने हजेरी न लावल्यास मतदान ५० ते ६० टक्क्यांदरम्यान होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. महानगरपालिकेतील ग्रामीण भागात असलेल्या प्रभागात निवडणूक काम करताना प्रशासनाला सध्या अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
१११ प्रभागाचे काम १० केंद्रातून करण्यात येत आहे. त्याकरिता ठाणे व पालघर जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपरिषदा, बांधकाम विभाग व अन्य सरकारी खात्यातील कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले आहे. उमेदवाराचा दैनंदिन खर्च रोजच्या रोज निवडणूक आयोगाच्या मुख्यालय तसेच अन्य ९ केंद्रात देण्याचे बंधन टाकण्यात आल्यामुळे उमेदवारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. (प्रतिनिधी)