लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मुसळधार पावसात धोकादायक झाडे कोसळून होणारे अपघात टाळण्यासाठी महापालिकेने आतापर्यंत ९५ हजार २०९ झाडांच्या फाद्यांची छाटणी केली आहे. याशिवाय खासगी आणि शासकीय जागेतील तब्बल १० हजार ३८४ संस्था, सोसयट्यांना वृक्ष छाटणीच्या नोटीसही दिल्या आहेत, अशी माहिती पालिकेच्या उद्यान विभागाने दिली आहे.
पालिकेच्या पावसाळापूर्व कामांमध्ये मृत, तसेच धोकादायक झाडांचे निर्मूलन, अनावश्यक फांद्यांची छाटणी, फळे व झावळ्या काढणे, उन्मळून पडलेल्या झाडांची विल्हेवाट लावणे, झाडांचे पुनर्रोपण करणे, झाडांचा तोल सुस्थितीत आणणे व कीटकनाशकांची फवारणी करणे आदींचा समावेश आहे.
आता मोफत सेवा
नवीन धोरणानुसार आता खासगी जागेतील धोकादायक वृक्षांची छाटणीही महापालिका प्रशासन सार्वजनिक जबाबदारी म्हणून मोफत करून देणार आहे, अशी माहिती उद्यान विभागाकडून देण्यात आली.
कंत्राटदारांची वॉर्डनिहाय नियुक्ती
मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांत रस्त्यांवर १ लाख ८६ हजार २४६ झाडे असून त्यातील १ लाख ४९ हजार ८०१ झाडांचे सर्वेक्षण केले होते. यापैकी १ लाख १० हजार ७७१ झाडांच्या फांद्या छाटण्याची आणि मृत, धोकादायक आणि वाकलेल्या ७०७ झाडांचे निर्मूलन करण्याची सूचना उद्यान विभागाने दिली होती. रस्त्याच्या बाजूला असलेल्या ९५ हजार २०९ झाडांची छाटणी करण्यात आली आहे. त्यासाठी महापालिकेने वॉर्डनिहाय कंत्राटदारांची नियुक्ती केली होती.
छाटणीनंतर फांद्या पडून वृक्ष छाटणीच्या कामाने वेग घेतला असला तरी छाटणीनंतर झाडांचा पालापाचोळा आणि फांद्या बरेच दिवस त्याच ठिकाणी पडून असल्याच्या तक्रारी मुंबईकरांकडून करण्यात येत आहेत. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच पावसात तो पालापाचोळा कुजून त्याचा स्थानिकांना त्रास होत आहे.