भिवंडी-शीळफाटा उन्नत मार्गाचा प्रस्ताव
By Admin | Updated: December 19, 2014 23:15 IST2014-12-19T23:15:00+5:302014-12-19T23:15:00+5:30
कल्याण-शीळफाटा हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ आणि ४ ला जोडणारा असून त्याची क्षमता संपल्याने त्यावर उन्नत मार्ग

भिवंडी-शीळफाटा उन्नत मार्गाचा प्रस्ताव
ठाणे : कल्याण-शीळफाटा हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ आणि ४ ला जोडणारा असून त्याची क्षमता संपल्याने त्यावर उन्नत मार्ग बांधण्याचा प्रस्ताव तयार करून तो राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पाठविण्याचा आदेश शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम मंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी रस्ते विकास महामंडळाला दिला.
जिल्ह्यातील महत्त्वाच्या रस्ते आणि पूल प्रकल्पांना मार्गी लावण्यासाठी शिंदे यांनी शुक्रवारी विधानभवनात बैठक घेतली तिला आमदार प्रताप सरनाईक, नरेंद्र मेहता, सुभाष भोईर, ठाणे महापालिका आयुक्त असिम गुप्ता, मीरा-भार्इंदरचे आयुक्त सुभाष लाखे, कल्याण डोंबिवली महापालिकेचे आयुक्त रामनाथ सोनावणे, रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर, सहव्यवस्थापकीय संचालक रामचंदानी, मुख्य अभियंता तामसेकर, देवधर,उप मुख्य कार्यकारी अधिकारी गोविंद बोडके, सार्वजनिक बांधकामचे उपसचिव देबडवार आदी उपस्थित होते. ठाणे मीरा-भार्इंदर कल्याण -डोंबिवली, भिवंडी, कल्याण ग्रामीण या मुंबईला लागून असलेल्या प्रदेशातील अनेक पायाभूत प्रकल्प रखडले असून अस्तित्वात असलेल्या रस्त्यांची क्षमता संपल्याने नवे प्रकल्प तातडीने हाती घेण्याची आवश्यकता असून त्यासाठी एक सादरीकरण मुख्यमंत्र्यांना करण्याचा निर्णय या वेळी झाला.
घोडबंदर रोडवरील वाहतूककोंडी टाळण्यासाठी कासारवडवली, ओवळा, गायमुख या तीन ठिकाणी उड्डाणपूल आणि उन्नत मार्ग बांधण्याचा प्रस्ताव एमएमआरडीएकडे तीन वर्ष पडून आहे. त्यासाठी ५२५ कोटींचा खर्च अपेक्षीत आहे, असे सरनाईक यांनी यावेळी सांगितले. मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीतून शासनाला ४०० कोटींची स्टॅपड्यूटी मिळते. परंतु, एमएमआरडीए येथील पायाभूत सुविधांसाठी एक पैसाही खर्च करीत नाहीत अशी खंत आमदार मेहता यांनी व्यक्त केली. तर भिवंडी-शीळफाटा या रस्तावर बदलापूर, मानपाडा, डोंबिवली जंक्शन येथे उड्डाणपूल बांधावेत अशी मागणी आमदार सुभाष भोईर यांनी केली.
ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा-भार्इंदर, कल्याण ग्रामीण या हद्दीतील रस्ते विकासासाठी एमएमआरडीएने तातडीने पुढाकार घ्यावा यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबई वगळता एमएमआर प्रदेशातील सर्व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व प्रस्तावांचे सादरीकरण मुख्यमंत्र्यांकडे केले जाईल. त्यासाठी हिवाळी अधिवेशन संपताच मुख्यमंत्र्यासमवेत तातडीने बैठक घेतली जाईल असे यावेळी शिंदे यांनी सांगितले.
आजवर एमएमआरडीएने ठाणे शहर वगळता अन्य महानगरांकडे एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी यांनी सतत दुर्लक्ष केले आहे. भिवंडीतील पूल आणि अंजूरफाटा व मामणोली येथील उड्डाणपूल अनेक वर्षे झालीत रखडले आहेत. ते ही आता लवकरच मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ते झाल्यास या सर्व महानगरांचा व आसपासच्या मोठ्या परिसराचाही झपाट्याने विकास घडून येण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)