वसई-विरारमध्ये प्रचाराचे धुमशान
By Admin | Updated: June 2, 2015 22:57 IST2015-06-02T22:57:59+5:302015-06-02T22:57:59+5:30
निवडणुकीपूर्वीच बहुजन विकास आघाडीची शिटी जोरदार वाजू लागली आहे. चार जागा बिनविरोध झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे

वसई-विरारमध्ये प्रचाराचे धुमशान
दीपक मोहिते, वसई
निवडणुकीपूर्वीच बहुजन विकास आघाडीची शिटी जोरदार वाजू लागली आहे. चार जागा बिनविरोध झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पक्षाच्या नेत्या प्रविणा ठाकूर या बिनविरोध निवडून आल्यामुळे विशेष करून महिला वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
तिकिट वाटप करताना निष्ठावंतांना डावलल्याच्या निषेधार्थ नाराज शिवसैनिकांनी बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केला आहे.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवार रिंगणात उतरवले खरे, परंतु त्यांच्या प्रचाराचा अद्याप मागमूस नाही. दरम्यान आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मिशन १०५ जाहीर केले असून कोणत्याही परिस्थितीत १०५ जागा जिंकणारच, असा त्यांनी दावा केला आहे. एकंदरीत विरोधीपक्षांची सद्यस्थिती लक्षात घेता बहुजन विकास आघाडीला हितेंद्र ठाकूर यांनी जाहीर केलेले उद्दीष्ट गाठणे कठीण होणार नाही, असा अंदाज आहे.
बहुजन विकास आघाडीच्या उमेदवारांनी प्रचाराला सुरूवात केली. प्रत्येक प्रभागात सरासरी साडेसहा ते सात हजार मतदार आहेत. त्यांना दोनदा भेटण्याचे उद्दीष्ट अनेक उमेदवारांनी ठेवले आहे. सकाळी ९ ते रात्री ९.३० दरम्यान प्रचार सुरु असून दुपारी १ ते ४ दरम्यान उमेदवार विश्रांती घेत आहेत. त्यानंतर रात्री १० वाजेपर्यंत पदयात्रा व चौकसभा असा कार्यक्रम राबवत आहेत. उमेदवार थेट मतदाराशीच संवाद साधत आहेत. सत्ताधारी पक्षाचे उमेदवार प्रभागात झालेल्या विकासकामासंदर्भात माहिती देत आहेत.
दुसरीकडे विरोधीपक्ष प्रलंबित विकासकामे मतदारांसमोर ठेवत आहेत. साऱ्या राजकीय पक्षाच्या उमेदवारांचा प्रचाराच्या दोन फेऱ्या करण्याचा निर्धार आहे. त्यादृष्टीने उमेदवार कामाला लागले आहेत.
मुख्य लढत बहुजन विकास आघाडी व शिवसेनेत होण्याची शक्यता आहे. इतर राजकीय पक्षांना ५० च्या वर जागा लढवणे शक्य झाले नाही, असे असतानाही सेनेमध्ये बंडखोरी झाली. याचा फटका बसण्याची शक्यता आहे.
सेना व भाजपाची सध्याची राजकीय स्थिती लक्षात घेता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे वसई विरारच्या दौऱ्यावर येतील, अशी शक्यता नाही. महिला आरक्षणामुळे घायकुतीला आलेले राजकीय पक्ष व त्यांचे वरिष्ठ नेते जोरदार प्रचार करण्याच्या मनस्थितीत नाहीत. अशा स्थितीत प्रचाराचे धुमशान सुरु आहे.