गणेश विसर्जनाच्या निर्माल्यातून २० टन सेंद्रिय खताची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 00:34 IST2019-09-14T00:34:09+5:302019-09-14T00:34:35+5:30

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा अभिनव उपक्रम

Production of 3 tonnes of organic fertilizer from Ganesh Immersion Plant | गणेश विसर्जनाच्या निर्माल्यातून २० टन सेंद्रिय खताची निर्मिती

गणेश विसर्जनाच्या निर्माल्यातून २० टन सेंद्रिय खताची निर्मिती

मुंबई : दरवर्षी अनंत चतुर्थीनंतर मुंबईतील चौपाट्यांवर मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होते. त्याची योग्यरीत्या विल्हेवाट लावण्यात मुंबईकर अयशस्वी होतात. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा (अलिबाग)चे अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली अनंत चतुर्थी दिवशी पर्यावरण रक्षणासाठी निर्माल्यातून सेंद्रिय खताची निर्मिती करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथून फुले, फळे आणि आरास इत्यादी निर्माल्य गोळा करून त्याचे रूपांतर सेंद्रिय खतात केले जाणार आहे. तिन्ही ठिकाणच्या निर्माल्यातून सुमारे २० ते २५ टन सेंद्रिय खत निर्माण केले जाणार आहे. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्या वतीने मुंबईत ज्या-ज्या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले आहे तिथल्या झाडांवर या खताचा वापर केला जाणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानने दिली.

चौपाटीवर हजार स्वयंसेवक
गिरगाव चौपाटीवर एक हजार स्वयंसेवकांची मानवी साखळी तयार करण्यात आली होती. प्रतिष्ठानच्या वतीने शेकडो टन निर्माल्यापासून खताची निर्मिती केली जात आहे. चौपाटीवरील फुलांचे क्रशिंग करणारे मशीन ठेवण्यात आले होते. त्यामध्ये प्रतिष्ठानचे स्वयंसेवक निर्माल्याचे वर्गीकरण करून ते क्रशिंग मशीनमध्ये टाकत होते.

Web Title: Production of 3 tonnes of organic fertilizer from Ganesh Immersion Plant