Join us  

बोगस मतदान रोखण्यासाठी मतदार ओळखपत्र आधारला जोडा, मुख्यमंत्र्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 12:33 PM

निवडणुकांमध्ये होणारे बोगस मतदान ही निवडणूक आयोगासाठी डोकेदुखी ठरत आहे.

मुंबई - निवडणुकांमध्ये होणारे बोगस मतदान ही निवडणूक आयोगासाठी डोकेदुखी ठरत आहे. दरम्यान, निवडणुकीत होणारे बोगस मतदान रोखण्यासाठी मतदार ओळखपत्राला आधारकार्डशी जोडावे, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणुकीत होणाऱ्या बोगस मतदानाबाबत चिंता व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये फडणवीस यांनी बोगस मतदान रोखण्यासाठी मतदार ओळखपत्र आधारकार्डला जोडण्यात यावे, अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीतील बंपर यशानंतर आता या यशाची आगामी विधानसभा निवडणुकीतही पुनरावृत्ती करण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. एकीकडे संघटनात्मक पातळीवर इतर पक्षातील नेत्यांचे पक्षप्रवेश, बैठका, कार्यकर्त्यांशी संवाद या माध्यमातून पक्षाचा पाया भक्कम करण्याचे काम सुरू आहे. तर दुसरीकडे आता मतदारांना आकर्षित करण्यासाठी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आखाड्यात उतरणार असून, महाजनादेश यात्रेच्या माध्यमातून ते राज्य पिंजून काढणार आहेत. भाजपाची महाजनादेश यात्रा 1 ते 31 ऑगस्टदरम्यान चालणार आहे. यादरम्यान मुख्यमंत्री राज्यातील विविध भागांना भेट देणार आहे. तसेच आपल्या सरकारने राबवलेल्या योजनांची माहिती मुख्यमंत्री मतदारांना देणार आहेत. तसेच या योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांचीही भेट मुख्यमंत्री घेतील. या महाजनादेश यात्रेमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील सहभागी होणार आहेत. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसभारतीय निवडणूक आयोगभाजपा