Join us  

जपला सांस्कृतिक वारसा... भायखळा रेल्वे स्थानकाला युनेस्कोचा पुरस्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2022 2:14 PM

गॉथिक शैलीतील वास्तुकला असणारे भारतीय रेल्वेतील सर्वात जुने रेल्वे स्थानक म्हणून भायखळा स्थानकाचे नाव निघते.

मुंबई - राजधानी मुंबईतीलरेल्वे स्थानकांची रचना किंवा त्यांचं बांधकाम म्हणजे ऐतिहासिक ठेवाच म्हणावा लागेल. येथील स्थानकांची उभारणी करतानाही तत्कालीन वास्तूशास्त्रज्ञांनी आपलं कौशल्य पणाला लावलंय. म्हणूनच, आजही या वास्तू नाविन्यता दर्शवतात. मुंबईतील भायखळारेल्वे स्टेशन तसा १६९ वर्षे जुनं आहे. मात्र, या स्थानकाचं नवं रुप पाहून याचे बांधकाम अलिकडच्या काळातीलच आहे की काय, असे वाटल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे, सरकारने गेल्या ३ वर्षात या वास्तूची केलेली देखरेख, लहानमोठे बदल आणि पुनर्संरचना कामासाठी युनेस्कोकडून स्थानकास पुरस्कार जाहीर झाला आहे. 

गॉथिक शैलीतील वास्तुकला असणारे भारतीय रेल्वेतील सर्वात जुने रेल्वे स्थानक म्हणून भायखळा स्थानकाचे नाव निघते. गेल्या तीन वर्षांच्या कालावधीत या स्थानकाचे पुनर्संचयनाचे काम उत्कृष्ट आणि दर्जात्मक केल्याने युनेस्कोचा आशिया पॅसिफिक सांस्कृतिक वारसा संरक्षण पुरस्कार या स्थानकाला प्राप्त झाला आहे. हे काम ‘आय लव्ह मुंबई’ या स्वयंसेवी संस्थेने केले असून भाजप नेत्या शायना एनसी यांच्या नेतृत्त्वात आणि बजाज ग्रुप चॅरिटेबल ट्रस्टच्या सहाय्याने हे काम झले आहे.

दरम्यान, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. तसेच, या रेल्वे स्थानकाच्या शुभोभीकरणाचे फोटोही शेअर केले आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे ट्विट रिट्विट केले आहे. 

मुंबईतील भायखळा रेल्वे स्थानक, जिथून दीडशे वर्षांपूर्वी देशातील पहिली रेल्वे धावली होती, ते मूळ प्राचीन, वारसा, स्थापत्य वैभवात परत आले आहे. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत या रेल्वेच्या नूतनीकरणाचे विधीवत उद्घाटन एप्रिल महिन्यात करण्यात आले होते. दरम्यान, तत्पूर्वी या रेल्वे स्थानकाच्या नुतनीकरणाचे काम कोविडच्या काळात हाती घेण्यात आले. CSMT प्रमाणे, भायखळा शहराच्या पर्यटन सर्किटवर नाही. मात्र, युनेस्कोच्या मान्यतेने यावर भर दिला. त्यामुळे या प्रकल्पातून मजुरांना रोजगार मिळाला. विशेष म्हणजे कोविड लॉकडाऊन या मुजरांना घरी पाठवण्याऐवजी ४ महिने स्टेशनच्या आवारात ठेवण्यात आले. 20 जुलै 2019 रोजी तत्कालीन रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते कामांचे भूमिपूजन करण्यात आले होते. या तीन वर्षांच्या काळातील सर्वच बाबींची दखल युनेस्कोने घेतली आहे.

टॅग्स :मुंबईभायखळारेल्वेदेवेंद्र फडणवीस