वसई-विरार परिसरात कचर्यातून वीज
By Admin | Updated: May 31, 2014 01:03 IST2014-05-31T01:03:01+5:302014-05-31T01:03:01+5:30
वसई-विरार उपप्रदेशातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन महानगरपालिकेने कचर्यावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती प्रकल्प राबवण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे

वसई-विरार परिसरात कचर्यातून वीज
वसई : वसई-विरार उपप्रदेशातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन महानगरपालिकेने कचर्यावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती प्रकल्प राबवण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. त्याकरिता शासनाकडून अनुदान मिळवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. सदर प्रकल्प बीओटी तत्त्वावर राबवण्याचा किंवा पीपीपी तत्त्वावर याबाबत शासनस्तरावर विचारविनिमय होत आहे. मंजुरी मिळाल्यानंतर सदर प्रकल्प दोन वर्षात उभारण्याचा मनपा प्रशासनाचा प्रयत्न आहे. वाढती लोकसंख्या, जमा होणारा कचरा, त्याची विल्हेवाट व डम्पिंग ग्राऊंडची उपलब्धता अशा प्रश्नांमुळे गेल्या ४ वर्षापासून प्रशासन अडचणीत सापडले आहे. वसई पूर्वेस गोखिवरे येथे महानगरपालिकेने डम्पिंग ग्राऊंडची निर्मिती केली व त्याचे व्यवस्थापन खाजगी ठेकेदाराकडे सोपवले परंतु कचर्याची विल्हेवाट लावण्याचा खर्च ठेकेदाराला न परवडल्यामुळे त्यांनी सदर काम अर्धवट अवस्थेत सोडले. त्यामुळे त्या भागातील नागरिकांना सध्या प्रचंड दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या महासभेत कचर्यातून वीजनिर्मिती करण्याचा प्रस्ताव चर्चेला आला व त्यास सर्वच नगरसेवकांनी पाठिंबा दिला. यासंदर्भात लवकरच निविदा मागवण्यात येणार असून निविदा मागवल्यानंतर प्रकल्प राबवणार्या ठेकेदाराला सबसिडी द्यायची की नाही याबाबतचा निर्णय होणार आहे. दररोज जमा होणारा कचरा लक्षात घेऊन प्रशासनाने ६०० टनाचा प्रकल्प राबवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. यासंदर्भात अधिक माहिती देताना मनपाचे उपायुक्त डॉ. सुनील लहाने म्हणाले, राज्य शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर सदर प्रकल्प दोन वर्षात सुरू होईल व कचर्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल असे लोकमतला सांगितले. (प्रतिनिधी)