वीज वितरण कंपनीचा मनमानी कारभार
By Admin | Updated: July 28, 2014 00:15 IST2014-07-28T00:15:41+5:302014-07-28T00:15:41+5:30
परिसरातील इंदिरानगर, लोकमान्यनगर या ठिकाणी शून्य लोडशेडिंग असतानाही दिवसभरात चार ते पाच वेळा वीज खंडित करण्यात येते

वीज वितरण कंपनीचा मनमानी कारभार
वागळे इस्टेट : परिसरातील इंदिरानगर, लोकमान्यनगर या ठिकाणी शून्य लोडशेडिंग असतानाही दिवसभरात चार ते पाच वेळा वीज खंडित करण्यात येते. तसेच या परिसरात विविध ठिकाणी डीपी उघड्या असून, तिथे वीज वितरण कर्मचाऱ्यांऐवजी काही नागरिकच दुरुस्ती करीत असतात. या उघड्या डीपीमुळे अनेक वेळा अपघात झाले असून, वितरण कंपनी याकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली आहे.
विजेचा लपंडाव सुरू असल्यामुळे वीज ग्राहकांना या अघोषित भारनियमनाला सामोरे जावे लागते. विजेचा हा लपंडाव कधी संपणार, असा सवाल येथील रहिवाशांनी उपस्थित केला आहे. उघड्या डीपी आणि विजेचा लपंडाव न थांबल्यास वितरण कंपनीवर मोर्चा नेण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. (वार्ताहर)