ऐन उन्हाळ्यात बत्ती गुल; मुंबई घामाघूम, दक्षिण मुंबई पुन्हा अंधारात
By सचिन लुंगसे | Published: April 3, 2024 06:01 PM2024-04-03T18:01:03+5:302024-04-03T18:01:59+5:30
गेल्या आठवड्यात सलग दोन दिवस रात्रीदरम्यान दक्षिण मुंबईतील फोर्ट, मरिन लाइन्स, क्रॉफेड मार्केटसह लगतच्या परिसरात वीज पुरवठा खंडीत झाला होता.
![Power cut in summer; South Mumbai again in darkness | ऐन उन्हाळ्यात बत्ती गुल; मुंबई घामाघूम, दक्षिण मुंबई पुन्हा अंधारात Power cut in summer; South Mumbai again in darkness | ऐन उन्हाळ्यात बत्ती गुल; मुंबई घामाघूम, दक्षिण मुंबई पुन्हा अंधारात](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/electricity_2017071165.jpg)
ऐन उन्हाळ्यात बत्ती गुल; मुंबई घामाघूम, दक्षिण मुंबई पुन्हा अंधारात
मुंबई : दक्षिण मुंबईतल्या विविध परिसरात वीज पुरवठा खंडीत होण्याचे सत्र सुरुच असून, मंगळवारी दुपारी अडीच ते पाच आणि बुधवारी सकाळी अकरा ते साडे अकरा वाजेदरम्यान भुलेश्र्वर परिसरात बत्ती गुल झाली होती. ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांची घामाच्या धारांनी आंघोळ होत असतानाच सतत वीज पुरवठा खंडीत होत असल्याने वीज ग्राहकांनी बेस्टच्या नावाने बोटे मोडली आहेत.
गेल्या आठवड्यात सलग दोन दिवस रात्रीदरम्यान दक्षिण मुंबईतील फोर्ट, मरिन लाइन्स, क्रॉफेड मार्केटसह लगतच्या परिसरात वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्याचा फटका येथील रुग्णालयांना बसला होता. वीसएक मिनिटांत रुग्णालयांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यास बेस्टला यश आले असले तरी उर्वरित परिसरात वीज पुरवठा पूर्ववत होण्यास बराच कालावधी लागला होता. कर्नाक बंदर येथील टाटाच्या फिडरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडाच्या कारणात्सव वीज पुरवठा खंडीत होत असल्याचे कारण बेस्टकडून सातत्याने पुढे केले जात आहे. तर दुसरीकडे फिडरपासून पुढे वीज वाहून नेणा-या केबलमध्ये बिघाड असल्याने वीज पुरवठा खंडीत होत असल्याचे चित्र आहे. बेस्टच्या केबल जुन्या झाल्या असून, त्याचा फटका वीज ग्राहकांना बसत असल्याच्या तक्रारींचा पाढा वीज ग्राहकांकडून वाचला जात आहे.