युतीच्या सत्तेतही प्रशासनाची मानसिकता काँगे्रस राजवटीचीच
By Admin | Updated: June 6, 2015 23:11 IST2015-06-06T23:11:33+5:302015-06-06T23:11:33+5:30
काँग्रेसची सत्ता जाऊन राज्यात युतीची सत्ता आली, पण प्रशासनात काहीच फरक पडलेला दिसत नाही. युतीचे शासन गतिमान असून

युतीच्या सत्तेतही प्रशासनाची मानसिकता काँगे्रस राजवटीचीच
डोंबिवली : काँग्रेसची सत्ता जाऊन राज्यात युतीची सत्ता आली, पण प्रशासनात काहीच फरक पडलेला दिसत नाही. युतीचे शासन गतिमान असून तसे काम प्रशासनाने करण्याची गरज आहे. मात्र, त्यांची अजूनही तशी मानसिकता झाल्याचे दिसत नाही, अशी टीका आमदार सुभाष भोईर यांनी केली.
‘खासदार तुमच्या भेटीला’ अंतर्गत उपक्रमात श्रीकांत शिंदे यांना आलेल्या तक्रारींमध्ये निवासी भागातील रस्त्यांच्या समस्यांचे प्रमाण जास्त होते. त्यांची दखल घेऊन ३ जून रोजी खासदारांसह आमदार सुभाष भोईर यांनी डोंबिवली औद्योगिक विभागाचे अधीक्षक अभियंता सुभाष तुपे, कार्यकारी अभियंता शंकर जगताप तसेच उपअभियंता यांच्याशी चर्चा करून त्यांना धारेवर धरले.
येथील औद्योगिक निवासी विभागातील रस्ते अत्यंत खराब अवस्थेत असून केवळ चर्चा, बैठका होत असून प्रत्यक्ष कामे चालू होत नाहीत. याबाबत, तातडीने कृती झालेली आम्हाला दिसली पाहिजे, अशी अपेक्षाही उपस्थित शिष्टमंडळाने व्यक्त केली.
एमआयडीसीचे स्पष्टीकरण
महानगर गॅस यांनी रस्ते खोदाई करताना मंडळाकडे २.२५ कोटी रुपये जमा केले असून रस्त्याच्या कडेने लाइन टाकण्यासाठी खोदलेल्या भागाचे डांबरीकरण केले असल्याचे जगताप यांनी सांगितले. यावर, महानगरचे पैसे खर्च केले, परंतु रस्त्यांच्या मधोमध खड्डे पडले आहेत, ते मंडळाने बुजवायला हवेत. ते तुम्ही का करत नाही, असा जाब संबंधित अधिकाऱ्यांना विचारण्यात आला. त्यावर, सदर काम दोन दिवसांत करू, असे आश्वासन त्यांनी दिले. डागडुजीच्या कामाव्यतिरिक्त मंडळाच्या अखत्यारीतील सर्व मूळ रस्ते नव्याने करण्यासाठीचा प्रस्ताव ज्यामध्ये सुमारे ३३ किमी लांबीचे व ३६ कोटी रुपयांचे प्रस्ताव मुंबई येथील मुख्यालयात गेलेले आहे. तेथून पुढील हालचाली अपेक्षित असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार उद्योगमंत्री सुभाष देसाई सोबत बैठक लवकरच घेण्यात येईल, असेही भोईर यांनी सांगितले.