Join us  

पोलिसांना बांबूने मारहाण; शिवाजी नगरमध्ये दादागिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2020 1:09 AM

कर्तव्य बजावणारे होताहेत टार्गेट

मुंबई : धारावीत पोलिसांवर झालेल्या दगडफेकीच्या घटनेनंतर शिवाजी नगरमध्ये गर्दी पांगविण्यासाठी गेलेल्या पोलिसांना बांबूने मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे कर्तव्य बजावणाऱ्यांनाच टार्गेट केले जात आहे.

शिवाजी नगर परिसरात बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास गस्त घालत असताना काही जण घोळका करून उभे असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी त्यांना घरी जाण्याचा सल्ला दिला. त्यांनी पोलिसांशीच हुज्जत घालण्यास सुरुवात केली. त्यानंतर पोलिसांना बांबूने मारहाण केली. ही बाब अन्य कर्मचाऱ्यांना कळताच जखमी पोलिसांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शुक्रवारी या चौकडीतील वाजीद शेख आणि सलमान ऊर्फ सुल्ली या दोघांना अटक करण्यात आली आहे़ यापुर्वी धारावी पोलीस ठाण्यातील दोन पोलीस शिपाई बुधवारी सायंकाळी जोगळेकर नाला रोड परिसरात गस्त घालत होते. यादरम्यान ओमदत्त सोसायटीजवळ सात ते आठ जण विनाकारण घोळका करून असताना पोलिसांनी या तरुणांना हटकले. जमावबंदी असतानाही हे तरुण जात नसल्याने पोलिसांनी कारवाईचा इशारा देताच या तरुणांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक करण्यास सुरुवात केली.

तर भेंडीबाजार येथेही मंगळवारी रात्री नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी एका विनाकारण भटकणाºया दुचाकीस्वाराला अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र दुचाकी चालकाने न थांबता पोलिसालाच फरफटत नेल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी जे जे मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांचा आदर करण्याऐवजी त्यांना मारहाण होणे चुकीचे असल्याचे पोलीस कुटुंबीयांचे म्हणणे आहे.डोंगरीतील शाह बाबा दर्गाह येथे गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास नियमांचे उल्लंघन करणाºया तरुणाला हटकल्याच्या रागात त्याने गस्तीवर असलेल्या पोलिसांना मारहाण करत त्यांच्या अंगावर थुंकल्याची घटना घडली.

आरोपींचा आकडा १५०० पार

च्लॉकडाउनच्या काळात कोरोनाबाबत प्रतिबंधात्मक म्हणून दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी २० मार्च ते २एप्रिलपर्यंत १५२६ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ११९४ जणांवर अटकेची कारवाई करत त्यांना जामिनावर सोडून देण्यात आले आहेत. यापैकी २२४ नोटीस देऊन सोडून देण्यात आले आहे.

च्कोरोनाचे संशयितांविरुद्ध ४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर , हॉटेल आस्थापना २५, पान टपरी १६, इतर दुकाने ५७, हॉकर्स/ फेरीवाले २२, सार्वजनिक ठिकाणी गर्दी केल्याप्रकरणी ३९२, तर अवैध वाहतूक प्रकरणी २७५ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यापोलिस