प्लॅस्टिकला तिलांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 03:47 AM2018-07-23T03:47:52+5:302018-07-23T03:48:25+5:30

पर्यावरणासह भविष्यातील संकटांची चाहूल ओळखत, शासनाने प्लॅस्टिकबंदीचा घेतलेला निर्णय एक महिन्याभरापूर्वी प्रत्यक्ष लागू केला.

Plastic closes | प्लॅस्टिकला तिलांजली

प्लॅस्टिकला तिलांजली

googlenewsNext

मुंबई : पर्यावरणासह भविष्यातील संकटांची चाहूल ओळखत, शासनाने प्लॅस्टिकबंदीचा घेतलेला निर्णय एक महिन्याभरापूर्वी प्रत्यक्ष लागू केला. प्लॅस्टिकबंदी लागू झाल्यापासून प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्यांवर महापालिकेच्या प्लॅस्टिक निर्मूलन पथकाने कारवाई करण्यास सुरुवात केली. केवळ कारवाई नाही, तर पाच हजार रुपये दंडही ठोठावला. आज महिन्याभरानंतर खरेच प्लॅस्टिकबंदी लागू झाली आहे का, ग्राहक आणि दुकानदार खरेच प्लॅस्टिकपासून दूर गेले आहेत का? की, अजूनही खुलेआम प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरू आहे, याबाबतचे वास्तव टिपण्यासाठी ‘लोकमत’ टीमने मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरात ‘रिअ‍ॅलिटी चेक’ केले. यात अनेकांनी प्लॅस्टिक पिशव्यांना तिलांजली दिल्याचे निदर्शनास आले. जमेची बाजू म्हणजे, मुंबईकरांनी पर्यावरणस्नेही अशा कापडी, कागदी पिशव्या वापरण्यावर भर दिला. याचेच फलित म्हणून प्लॅस्टिकबंदीचा श्रीगणेशा उत्तम होत या निमित्ताने सकारात्मक चित्र मुंबापुरीत निदर्शनास आले. मात्रअद्यापही मुंबईतील अनेक ठिकाणी प्लॅस्टिकबंदी झुगारून बिनदिक्कतपणे प्लॅस्टिकचा वापर सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

भायखळा, माझगाव
स्वागत अन् फटकाही

भायखळा स्थानक परिसरातील किराणा माल विक्रेत्यांनी प्लॅस्टिकबंदीचे स्वागत करीत जुन्या कागदांपासून पिशव्या तयार केल्या आहेत. त्यामुळे नागरिकही या निर्णयाचा अवलंब करीत प्लॅस्टिकचा वापर टाळत आहेत. माझगाव येथील प्रख्यात ज्युस सेंटरमध्ये प्लॅस्टिकबंदीमुळे पार्सल सेवा बंद झाली आहे. गेल्या एक महिन्यात याचा फटका ज्युस सेंटरला बसल्याची माहिती दुकानदाराने दिली. तर येथील औषध विक्रेत्यांनी या प्लॅस्टिकबंदीवर पर्याय म्हणून कागदाच्या पिशव्या तयार केल्या आहेत. मात्र ग्राहकांना दहा रुपये देऊन या पिशव्या विकत घ्याव्या लागत आहेत. त्यामुळे उत्पादनांच्या खरेदीशिवाय अतिरिक्त आकारण्यात आलेल्या या दरांमुळे दुकानदार आपला फायदा करून घेत आहेत, याची स्थानिक ग्राहकांनी तक्रार करूनही काहीही कार्यवाही झालेली नाही.

मुलुंड, कांजूरमार्ग
विक्रेते प्लॅस्टिक पिशवीचा वापर टाळत आहेत

रेल्वे स्थानकांच्या परिसरात फळ विक्रेते स्वत:हून प्लॅस्टिक पिशवीचा वापर टाळताना दिसून येत आहेत. प्लॅस्टिक पिशवीऐवजी कागदाचा वापर करतात. नागरिक स्वत: कापडी किंवा कागदी पिशव्या वापरत आहे. किरकोळ किराणा दुकानात प्लॅस्टिक पिशव्या दिसून येत आहेत. सँडविच, वडापाव विक्रेत्यांकडे प्लॅस्टिकला पर्यायी वस्तूचा वापर केला जातो. काही मांस विक्रेत्यांकडे प्लॅस्टिक पिशव्या मिळत आहेत, तर काही मांस विक्रेत्यांकडे घरातूनच भांडी घेऊन मांस किंवा माशांची खरेदी केली जाते. कांजूरमार्ग येथील रहिवासी मयूर मांडवणकर यांनी सांगितले की, कांजूरमार्ग पूर्वेकडील नेहरूनगरमध्ये प्लॅस्टिकबंदीला सकारात्मक पाठिंबा आहे.

क्रॉफर्ड मार्केट
प्लॅस्टिक हद्दपार

दक्षिण मुंबईतील मोठी बाजारपेठ मानल्या जाणाºया क्रॉफर्ड मार्केटमध्ये प्लॅस्टिकबंदीचे काटेकोर पालन होताना दिसले. या वेळी मार्केटमधील एका फळ विक्रेत्याकडे प्लॅस्टिक पिशवीची मागणी करण्यात आली. मात्र, विक्रेत्याने प्लॅस्टिकची पिशवी नसल्याचे सांगितले. अधिक फळे घेण्याचे आमिष दाखविल्यानंतरही पिशवी नसल्याचे सांगण्यात आले. प्लॅस्टिक पिशवीला पर्याय म्हणून या ठिकाणी कागदी पिशव्यांसह कापडी पिशव्या ठेवण्यात आल्या होत्या. कागदी पिशवी मोफत, तर कापडी पिशवी १५ व २० रुपये दराने विकण्यात येत होत्या. फळ विक्रेत्यांव्यतिरिक्त सुका मेवा, गिफ्ट पॅकिंग, ग्लास, प्लेट्स अशा विविध वस्तू कागदी, कापडी आणि लाकडापासून तयार केल्याचे दिसले. किराणा पॅकिंगसाठी प्लॅस्टिक पिशव्यांना देण्यात आलेल्या परवानगीचाही विक्रेत्यांकडून पुरेपूर वापर होत असल्याचे चित्र मार्केटमध्ये दिसले.

कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर
आम्ही प्लॅस्टिकची पिशवी वापरत नाही

कुर्ला पश्चिमेकडील बैलबाजार, कुर्ला रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील बाजार परिसर, विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील परिसर, घाटकोपर पश्चिमेकडील बाजार परिसरातील फेरीवाल्यांसह दुकानदारांनी प्लॅस्टिकच्या पिशव्या देणे बंद केले आहे. नुसते देणे नाही, तर वापरणेच बंद केले. जेव्हा ग्राहक त्यांच्याकडे साहित्य घेतल्यानंतर प्लॅस्टिक पिशवीची मागणी करतात, तेव्हा आम्ही प्लॅस्टिकची पिशवी वापरत नाही; आणि देत नाही, असे उत्तर फेरीवाल्यांसह दुकानदारांकडून मिळते. विशेषत: तुम्हीही प्लॅस्टिकची पिशवी वापरू नका. प्लॅस्टिकची पिशवी मागू नका. कापडी अथवा कागदी पिशवी साहित्य घेण्यासाठी आणा, असा सल्लाही फेरीवाल्यांसह दुकानदारांकडून ग्राहकांना दिला जातो, असे ‘लोकमत’ने केलेल्या ‘रिअ‍ॅलिटी चेक’दरम्यान निदर्शनास आले. दरम्यान, कुर्ला रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील बाजार परिसरात मध्यंतरी कचºयाच्या डब्यासाठी वापरल्या जाणाºया काळ्या रंगाच्या प्लॅस्टिक पिशव्यांची विक्री केली जात होती, परंतु महापालिकेकडून वेगाने कारवाई होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर, या प्लॅस्टिकच्या पिशव्यांची विक्री बंद झाली आहे.

मालाड
पिशव्या बंद; कचरा निम्म्यावर आला

प्लॅस्टिकबंदीमुळे मालाडच्या साईनाथ मंडई येथील कचरा निम्म्यावर आला आहे. प्लॅस्टिकबंदी लागू झाल्यापासून येथे ८० ते ९० टक्के परिसरातून प्लॅस्टिक हद्दपार झाले २आहे. कांदे-बटाट्याचा व्यवसाय करणारे सुनील लोखंडे यांनी सांगितले की, ‘आम्ही व्यापारी वर्गाने प्लॅस्टिकबंदीला पाठिंबा दिला आहे. आम्ही कापडी पिशव्या आमच्या दुकानात ठेवतो. ज्याची किंमत पाच रुपयांपासून असून, एक ते दोन किलो भाजी अगदी सहज त्यातून नेता येते. पिशवी पुन्हा वापरता येते. मच्छी मार्केटमध्ये ‘आय अ‍ॅम डीस्पोझेबल’ असे लिहिलेल्या पिशव्या ठेवण्यात आल्या आहे. मालाडच्या सोमवार बाजारात भाजीवाल्यांनी प्लॅस्टिक पिशव्या देण्याचे बंद केले आहे.

मालाड, कांदिवली, वांद्रे
आम्ही बाजारात कापडी पिशव्या घेऊन जातो

कांदिवली येथील छोट्या दुकानात प्लॅस्टिक पिशव्या दिल्या जात नाहीत, तसेच किराणा मालाच्या दुकानात धान्य, कडधान्य इत्यादी मालासाठी प्लॅस्टिक पिशव्या वापरल्या जातात. मालाड येथे छोटे दुकानदार वस्तू कागदामध्ये गुंडाळू देत आहेत.
मालाड पूर्वेकडील फळविक्रेते केळी कागदामध्ये गुंडाळून ग्राहकांना देत आहेत, परंतु काही मासळीवाले आणि चिकन शॉपमध्ये ग्राहकांना प्लॅस्टिक पिशव्या देताना दिसून आले.
वांद्रे येथील गृहिणी रेश्मा वारे सांगतात की, दुकानदार प्लॅस्टिक पिशव्या देत नाहीत. मात्र, काही भाजी आणि कांदा-बटाटा विक्रेते प्लॅस्टिक पिशव्या ग्राहकांना देतात. आम्ही आता बाजारात कापडी पिशव्या घेऊन जातो. काही दुकानदार कागदी पिशव्या तयार करून त्यातून ग्राहकांना वस्तू देतात. काही विक्रेते आणि दुकानदार हे ग्राहक तुटले जाऊ नयेत, म्हणून नाव न सांगण्याच्या अटीवर प्लॅस्टिक पिशव्या सर्रास देतात.

चारकोप, कांदिवली
जनजागृती आवश्यक

चारकोप, कांदिवली विभागात प्लॅस्टिकबंदीबद्दल अजूनही सर्वसामान्यांमध्ये असलेल्या जनजागृतीचा अभाव आणि व्यापारी, दुकानदार यांच्याकडून छुप्या पद्धतीने प्लॅस्टिकची विक्री समोर आली. चारकोप मार्केटमध्ये भाजीवाल्याकडे भाजी घेतलीत, तर ती तुमच्या कापडी पिशवीतूनच घ्यावी लागेल. मात्र, तुमच्याकडे ती नसेलच तर भाजीवाला त्याच्याकडील प्लॅस्टिक पिशवीही देतो, त्यामुळे भाजी विक्रेत्यांकडून तरी अद्याप प्लॅस्टिक वापर पूर्णपणे बंद नाहीच. नॉनव्हेजही काळ्या रंगाच्या प्लॅस्टिक पिशवीतूनच मिळते. त्यामुळे ग्राहकांना कापडी पिशवी घेऊन जाण्याची गरज वाटत नसल्याचे समोर आले. त्यातल्या त्यात फळ आणि नारळपाणी विक्रेते प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर करत नसल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे ग्राहकांना नारळ पाण्यासाठी संपूर्ण नारळ घ्यावा लागत असल्याने ग्राहक कमी झाल्याचा सूरही विक्रेते लावत आहेत.

दादर
१०० टक्के प्लॅस्टिकबंदी

दादरमध्ये सर्व व्यापारी, भाजीविक्रेते यांनी नो प्लॅस्टिक धोरण अवलंबले आहे. महिन्याभरात पालिकेने केलेल्या दंडात्मक कारवाईमुळे येथील छोट्या-मोठ्या व्यापारी, दुकानदारांनी प्लॅस्टिक पिशवी आपल्या दुकानातून हद्दपार केल्याचे चित्र समोर आले आहे. दादर स्टेशन परिसरात असणाºया दुकानांमध्ये आता प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळून कापडी किंवा कागदी पिशव्या वापरल्या जाऊ लागल्या आहेत. ज्या ग्राहकांकडे पिशव्या नसतील, त्यांना कागदामधून साहित्य गुंडाळून दिले जात आहे. दादर स्टेशन परिसरात अनेक लहान-मोठी दुकाने आहेत. महिन्याभरात गणेशोत्सव असल्यामुळे सध्या दादरच्या बाजारपेठा गणेशोत्सवाच्या साहित्यांनी फुलून गेल्या आहेत. त्यामुळे नागरिकांची बरीच गर्दी होतेय. मात्र, या दुकानात प्लॅस्टिकचे कोणतेही साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले नाही. प्लॅस्टिक कप, चमचे, वाट्या, ताट यांची जागा आता कागदी आणि लाकडी वाट्या, चमचे, कप यांनी घेतली आहे. दादर स्टेशनला लागून असलेल्या सावरकर भाजीमंडईतही प्लॅस्टिकबंदी कडकपणे पाळली जात आहे. भाजी विक्रेते भाज्या ग्राहकांना कापडी पिशवीत अथवा कागदात गुंडाळून देत असल्याचे चित्र दिसत आहे. व्यापारी आणि भाजी विक्रेत्यांनी पालिकेकडून होत असलेल्या कारवाईची धास्ती घेतली आहे. दंड हजारांच्या घरात असल्याने प्लॅस्टिक सोडून

Web Title: Plastic closes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.