विद्यार्थिनींसाठी प्रबोधनात्मक शिबिर
By Admin | Updated: August 28, 2014 00:18 IST2014-08-28T00:18:04+5:302014-08-28T00:18:04+5:30
बालवयातून तारूण्याकडे जाणारा काळ अतिशय नाजूक असतो. त्यावेळी मुलींवर चांगल्या संस्काराबरोबरच प्रबोधन होणे गरजेचे आहे.

विद्यार्थिनींसाठी प्रबोधनात्मक शिबिर
पनवेल : बालवयातून तारूण्याकडे जाणारा काळ अतिशय नाजूक असतो. त्यावेळी मुलींवर चांगल्या संस्काराबरोबरच प्रबोधन होणे गरजेचे आहे. त्याच हेतूने डी.आर. पाटील मेडिकल रिसर्च सेंटर आणि लोकमत यांच्या संयुक्त विद्यमाने मार्गदर्शन शिबिर घेऊन प्रौढत्वाचे धडे देण्यात आले.
तुर्भे येथे बुधवारी डॉ. एस.व्ही. सामंत माध्यमिक विद्यालयात बालपणातून तरूण वयात जाताना घ्या प्रौढत्व समजावून, समज आणि गैरसमज या विषयावर स्त्री रोग तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्यां डॉ. प्रज्ञा भोईर, अॅचिवट संस्थेच्या डॉ. वीणा वैश्य, पोलीस निरीक्षक माया मोरे यांनी मार्गदर्शन केले. साधारणत: वयाच्या १३ ते १६ या कालावधीत शरिरात बदल घडत असतात. अशा वेळीला मुलींना जास्त सावध राहण्याची गरज असल्याचे डॉ. प्रज्ञा भोईर यांनी सांगितले. आज समाजामध्ये चांगल्यापेक्षा वाईट प्रवृत्ती लवकर फोफावताहेत अशा वेळेला स्वत: सावरायचे असते असा सल्ला भोईर यांनी दिला. या काळात आपल्या मैत्रिणीही सुध्दा चुकीचा विचार करीत असतील तर त्यांना वेळीच सावध करा, वयात आलेल्या मुलींनी आपल्या आईला सर्वात जवळची मैत्रीण मानावी असेही प्रज्ञा भोईर यांनी सांगितले. जसजसे मुलींचे वय वाढते त्याप्रमाणे त्यांच्या मनात वेगवेगळे विचार येतात.
मुलींनी आपल्या पालकांबरोबर सर्व गोष्टी मनमोकळेपणाने बोलल्या पाहिजे असे डॉ. वीणा वैश्य यांनी सांगितले. स्वत:च्या सौंदर्याची इतरांशी तुलना करू नका असा सल्ला त्यांनी दिला. जे आपल्याला मिळाले आहे ते देवाने दिलेले वरदान असाच नेहमी विचार करून स्वत:ला कधी कमी न लेखण्याचे वैश्य यांनी सांगितले. महिला आजच्या युगात पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. त्या सर्व क्षेत्रात आघाडीवर असल्याचे माया मोरे यांनी सांगितले. वर्तमानपत्रातून आपल्याला आजूबाजूच्या घटना आणि घडामोडीचे आकलन होते. जो कोणी मुलीची छेडछाड करीत असतील तर त्यांची तक्रार करा, त्यांच्यावर कारवाई होणार म्हणजे होणार असे मोरे म्हणाल्या. भारतीय संस्कृतीचा आदर करून कोणत्याही चुकीच्या प्रवृत्तीला बळी पडू नका असे आवाहन मोरे यांनी केले. या शिबिरात डॉ. एस.व्ही. सामंत माध्यमिक विद्यालय, डी.आर. पाटील, आय.सी.एल. मोनामी, अंजुमन इस्लाम विद्यालय त्याचबरोबर महानगरपालिकेच्या शाळेतील सुमारे आठशे विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. यावेळी नगरसेविका शुभांगी पाटील, लोकमतचे प्रशासन अधिकारी सचिन लिगाडे उपस्थित होते.
(वार्ताहर)