पेट्रोल गळतीमुळे घेतला पेट
By Admin | Updated: June 14, 2015 03:14 IST2015-06-14T02:08:27+5:302015-06-14T03:14:45+5:30
वडाळ््यातील भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पाईपलाईनमधील लिकेजने अचानक पेट घेतल्याने शनिवारी संध्याकाळी सातच्या सुमारास कॅस्ट्रॉल कंपनीजवळ आग लागली.

पेट्रोल गळतीमुळे घेतला पेट
मुंबई : वडाळ््यातील भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पाईपलाईनमधील लिकेजने अचानक पेट घेतल्याने शनिवारी संध्याकाळी सातच्या सुमारास कॅस्ट्रॉल कंपनीजवळ आग लागली. सकाळपासून हे लिकेज सुरू असल्याने ही आग सर्वत्र पसरली. येथून शिवडीपर्यंत पेट्रोल-डिझेल साठ्याच्या मोठ्या टाक्या आहेत. तेथे जवळ असलेल्या खाडीकिनारी तेलशुद्धीकरण प्रकल्प आहेत. वेळीच ही आग आटोक्यात आली नसती तर या टाक्यांनी व रिफायनरीने पेट घेतला असता व हजारो कोटी रूपयांचे नुकसान झाले असते. तसेच अर्धी मुुंबई या आगीच्या तडाख्यात सापडली असती. पण अग्निशमन दलाने वेळेत ही आग आटोक्यात आणली आणि पुढील मोठी दुर्घटना व नुकसान टळले.
या आगीचे प्राथमिक कारण समजू शकले नाही. पण येथे गेली अनेक वर्षे काम करणाऱ्या कामगारांनी तेथील कॅस्ट्रॉल कंपनीच्या वीज मीटर बॉक्समध्ये शॉकसर्कीट झाल्याने ही लागल्याचा अंदाज वर्तवला. या आगीचे लोट उंच आकाशात जात होते. त्यामुळे आसपासच्या परिससरात भीतीचे वातावरण होते. ही भयानक आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे नऊ आगीचे बंब, सहा पाण्याचे जम्बो टँकर, तीन रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या़
येथून ईस्टर्न फ्री-वे जातो. ही आग पसरली असती तर वाहनांनाही याचा फटका बसला असता. माहुल परिसरात तेलशुद्धीकरण प्रकल्प आहेत. या प्रकल्पातून पेट्रोल, डिझेल पाईपलाईनद्वारे वडाळा-शिवडी येथील संबंधीत तेल कंपन्यांच्या टाक्यांमध्ये वाहून आणले जाते. पुढे हे इंधन या टाक्यांमध्ये साठवले जाते. शिवडी परिसरातील कॅस्ट्रॉल कंपनीच्या आॅईल डेपोमधून ही पाईपलाईन जाते. या वाहिनीतून शनिवारी सकाळी पेट्रोलची गळती सुरु झाल्याने दुरुस्तीचे काम कंपनीमार्फत सुरु करण्यात आले
होते़ मात्र संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास या वाहिनीने पेट घेतला. (प्रतिनिधी)
गळतीमुळे परिसरात सर्वत्र पेट्रोल पसरले होते. आग त्या सर्व ठिकाणी पोहोचली आणि पुढे पसरू लागली. त्यामुळे पोलिसांनी सर्तकता म्हणून येथील वाहतूक बंद केली तर आग विझविण्यासाठी अग्निशमन दल शर्थीचे प्रयत्न करत होते.मुख्य आग विझवण्यात दीड तासात अग्निशमन दलाला यश आले. मात्र लिकेज असलेल्या ठिकाणी आग सुरूच होती. तेथील आग आटोक्यात आणण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मुख्य आग आटोक्यात आल्याने येथील भीतीचे वातावरण निवळले.