सप्टेंबरमध्ये रुग्ण वाढले, मृत्यू कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 01:09 IST2020-09-25T01:09:06+5:302020-09-25T01:09:29+5:30

अनलॉकचा टप्पा, सण-उत्सवांचा काळ आणि चाचण्यांची वाढविलेली क्षमता यामुळे कोरोना रुग्णांच्या निदानाचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे.

Patients increased in September, deaths decreased | सप्टेंबरमध्ये रुग्ण वाढले, मृत्यू कमी

सप्टेंबरमध्ये रुग्ण वाढले, मृत्यू कमी

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आॅगस्टमध्ये नियंत्रणात आलेली मुंबईतील कोरोनाची स्थिती सप्टेंबरच्या पंधरवड्यात पुन्हा बिघडली. १ ते २२ आॅगस्ट या कालावधीत २०,०३१ कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. तर १ ते २२ सप्टेंबरदरम्यान तब्बल ४० हजार ९५७ बाधितांची नोंद झाली. दिलासादायक बाब म्हणजे १ ते २२ आॅगस्टदरम्यान ९९० मृत्यूंची नोंद झाली होती. याच कालावधीत सप्टेंबरमध्ये कोरोनामुळे ८६२ मृत्यू झाले.


अनलॉकचा टप्पा, सण-उत्सवांचा काळ आणि चाचण्यांची वाढविलेली क्षमता यामुळे कोरोना रुग्णांच्या निदानाचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. आॅगस्ट महिन्यात ७ ते ९ हजारांच्या दरम्यान कोरोना चाचण्या करण्यात येत होत्या. सप्टेंबर महिन्यात हे प्रमाण १० ते १४ हजारांच्या घरात गेले आहे.
पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सप्टेंबरमध्ये रुग्णसंख्येत कमालीची वाढ होण्याविषयी यापूर्वीच निरीक्षण मांडले होते. पालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, दररोज मुंबईत १५ हजार कोरोना चाचण्या घेण्याची क्षमता आहे. येत्या काळात मुंबईतील एकूण स्थिती पाहता चाचण्यांच्या क्षमतेत आणखी वाढ करण्यात येईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.


प्रतिबंधासाठी त्रिसूत्रीचा वापर
मुंबईत कोरोना चाचण्यांनी १० लाखांचा टप्पा ओलांडला आहे, यात पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण १८.२२ टक्के आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सध्या ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रीटमेंट या त्रिसूत्रीनुसार काम सुरू आहे.

Web Title: Patients increased in September, deaths decreased