राजाश्रय हवा असलेलेच पक्ष सोडतात!
By Admin | Updated: January 19, 2015 21:52 IST2015-01-19T21:52:12+5:302015-01-19T21:52:12+5:30
सत्ता असो वा नसो आम्ही जनतेत जास्त वेळ राहणारे लोक आहोत. समुद्राची भरती आली की ओहोटी ही येणारच

राजाश्रय हवा असलेलेच पक्ष सोडतात!
नांदगाव : सत्ता असो वा नसो आम्ही जनतेत जास्त वेळ राहणारे लोक आहोत. समुद्राची भरती आली की ओहोटी ही येणारच. शासकीय नियमांच्या व आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर मुरुड तालुक्याला लागणारा विकासनिधी कमी पडू देणार नाही. ज्यांना सरकारचा राजकीय आश्रय आवश्यक वाटतो, तेच लोक पक्ष सोडून जातात. जहाज बुडाल्यावर उंदीर उड्या सर्व प्रथम मारतात. तळागाळात पक्ष मजबूत करा मी तुमच्या पाठीशी आहे, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व आमदार सुनील तटकरे यांनी मुरुड येथे पक्ष कार्यकर्त्यांना दिला.
मुरुड तालुक्याचा कार्यकर्ता मेळावा माळी समाज हॉल येथे आयोजित केला होता. यावेळी ते मार्गदर्शनपर भाषणात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर तालुकाध्यक्ष मंगेश दांडेकर, अतिक खतीब, फैरोज घलटे, नगराध्यक्ष रहिम कबले, पंचायत समिती सदस्य अनंता ठाकूर, विहूर सरपंच इकरार मोदी, उपसरपंच योगेंद्र गोमजी, इम्तियाज मलबारी, नगरसेविका प्रमिला माळी, दीप्ती खेडेकर, अविनाश दांडेकर, नितीन पवार, स्मिता खेडेकर आदी उपस्थित होते. तटकरे म्हणाले की, भाजपा सरकारला काही विशेष कामगिरी करता आलेली नाही. (वार्ताहर)
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर खंबीरपणे उभे - तटकरे
च्महाराष्ट्रात १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळाची स्थिती आहे. कधी अवर्षण, तर कधी अवकाळी पाऊस कोसळल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नुकसान झाले आहे. प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस गंभीर असून विरोधी पक्ष म्हणून खंबीरपणे त्यांना न्याय देवू, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. मुरुड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते.