पालघरचा अब्दुल मुंबई बोर्डातून पहिला
By Admin | Updated: June 9, 2015 22:25 IST2015-06-09T22:25:46+5:302015-06-09T22:25:46+5:30
ध्येयाच्या प्राप्तीसाठी अविरत मेहनत घेतल्यास यशाचे मार्ग आपोआपच उघडले जातात हे येथील टिष्ट्वंकल स्टार इंग्रजी माध्यमातील शाळेचा विद्यार्थी अब्दुल कादीर सलीम खिमाजी यांनी दाखवून दिले.

पालघरचा अब्दुल मुंबई बोर्डातून पहिला
पालघर : ध्येयाच्या प्राप्तीसाठी अविरत मेहनत घेतल्यास यशाचे मार्ग आपोआपच उघडले जातात हे येथील टिष्ट्वंकल स्टार इंग्रजी माध्यमातील शाळेचा विद्यार्थी अब्दुल कादीर सलीम खिमाजी यांनी दाखवून दिले. त्याने एस.एस.सी परीक्षेत ९७.८० टक्के गुण घेत मुंबई बोर्डातून पहिला येण्याचा मान पहिल्यांदाच पालघर शहराला मिळवून दिला.
व्यावसायिक कुटूंबातील कादीर सलीम व शबादा यांचा अब्दुल हा मुलगा आहे. पालघरच्या टिष्ट्वंकल स्टार शाळेतून शिक्षण घेत असताना ज्युनिअर के.जीपासून त्याने प्रत्येक इयत्तेत प्रथम क्रमांक कधीही सोडला नाही. त्याने अभ्यासाच्या नियोजनाची आखणी केली. मागील वर्षीचे पेपर सोडविण्यावर भर दिला.
यावेळी टिष्ट्वंकल स्टार शाळेतील १९ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांच्या वर गुण मिळविले तर अब्दुल याने विज्ञानमध्ये ९९ गुण, गणित ९९, समाजशास्त्र ९९, संस्कृत ९९, मराठी ९३, इंग्रजी ९३ असे ६०० पैकी ५८२ गुण मिळविले. मराठी मातृभाषा नसताना व घरात कुणाला संस्कृतचा गंध नसतांना त्याने संस्कृत सारख्या विषयाची निवड करून ९९ गुण मिळविले.
अब्दुल सध्या मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती भाषेसह अरबी भाषा बोलतो. सध्या तो तेलगू भाषाही शिकत आहे.
९५ टक्के गुण मिळविण्याचे ध्येय त्याने डोळ्यासमोर ठेवले होते. मात्र मुंबई बोर्डातून पहिला येणार असे त्याला वाटले नसल्याचे सांगितले. आता तो आयआयटीमध्ये प्रवेश घेणार आहे. त्याने आपल्या यशाचे श्रेय आपले आई-वडील व शिक्षकांना दिले. पालघर जिल्हा निर्मितीनंतर प्रथमच मुंबई बोर्डातून पहिला येण्याचा मान अब्दुल खिमानी यांनी मिळवून दिल्याने शाळेचे मुख्याध्यापक केदार महाजन व विश्वस्त मनिषा कारडे, महेश वठावकर यांनी त्याचे अभिनंदन केले.
(प्रतिनिधी)