मुंबई : गेल्या काही वर्षांत अवयवदान जनजागृतीसाठी प्रयत्न केले जात असले, तरीही अवयवदात्यांचे प्रमाण वाढलेले नाही. त्यामुळे या मोहिमेला बळ मिळण्यासाठी शासनासोबत सामाजिक संस्थांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे मत वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. राज्यात अवयवनिहाय रुग्णांच्या प्रतीक्षा यादीत सर्वाधिक मागणी किडनीला आहे.
गेल्या काही वर्षांत अवयव निकामी झालेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. या रुग्णांची प्रतीक्षा यादी महिन्यागणिक वाढतच आहे. एक मेंदूमृत व्यक्ती ८ जणांचे जीव वाचवू शकते. मात्र मेंदूमृत व्यक्तीकडून अवयव दान होण्याचे प्रमाण कमी आहे. दोन्ही किडनी निकामी होण्याचे प्रकार वाढत आहेत. त्यावर किडनीची प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हा एकच पर्याय असतो. अन्यथा रुग्णांना कायमस्वरूपी डायलिसिस करावे लागते. त्यामुळे माणसाचे आयुर्मान कमी होते.
चला संकल्प करू या...अवयवदान जनजागृतीसाठी लोकमतने मोहीम हाती घेतली आहे. तुमचा एक निर्णय कुणाच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करू शकतो. अधिक माहितीकरिता तुम्ही लोकमत कार्यालयाशी संपर्क साधावा.
अवयवदान जनजागृतीची नितांत गरज आहे. अनेकांना अजूनही अवयवदान व अवयव प्रत्यारोपणाबद्दल माहिती नाही. प्रतीक्षा यादीवरील रुग्णांचा आकडा यापेक्षा मोठा असण्याची शक्यता आहे. डॉ. सुजाता पटवर्धन, सल्लागार समिती सदस्य, स्टेट ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन