Join us  

आमची मुंबई ‘बेस्ट’च; येथे चांगले जीवन जगण्याची संधी, सर्वेक्षण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2020 6:38 AM

Mumbai News : आयआयटी मुंबईने शहरांतील जीवनशैलीच्या दर्जाचा अभ्यास केला. याद्वारे दिल्ली, कोलकाता, चेन्नई, पटना, जयपूर, इंदौर, भोपाळ, लखनऊ अशा अनेक शहरांच्या तुलनेत मुंबईत जीवन जगण्याचा दर्जा बऱ्यापैकी उत्तम असल्याचा दावा करण्यात आला.

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी आणि प्रत्येकाला जगविणारी, अशी मुंबईची ओळख आहे. आता जीवनशैलीचा दर्जादेखील मुंबईत चांगला टिकून असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. मुंबई चांगली जीवनशैली जगण्याची संधी देते, असे यात नमूद करण्यात आले आहे.आयआयटी मुंबईने शहरांतील जीवनशैलीच्या दर्जाचा अभ्यास केला. याद्वारे दिल्ली, कोलकाता, चेन्नई, पटना, जयपूर, इंदौर, भोपाळ, लखनऊ अशा अनेक शहरांच्या तुलनेत मुंबईत जीवन जगण्याचा दर्जा बऱ्यापैकी उत्तम असल्याचा दावा करण्यात आला. पायाभूत सेवासुविधा, आर्थिक विकास, सुरक्षा, प्रवास, पर्यावरण, सर्वसाधारण सेवा, अशा अनेक बाबीत मुंबई, पुणे, कोलकाता, दिल्ली आणि चेन्नई ही शहरे आघाडीवर आहेत. तर याच प्रवर्गात पटना, इंदौर, लखनऊ ही शहरे खालच्या स्तरावर आहेत. आर्थिक विकासाबाबत मुंबई पसंतीस उतरली असून, पटना या शहरात मात्र अनेक घटकांचा अभाव असल्याचे सर्वेक्षण सांगते. मुंबई आणि इतर शहरांच्या पायाभूत सेवासुविधांप्रमाणेच महिला सक्षमीकरण, गुन्हे आदींचीही माहिती घेण्यात आली आहे. सर्वेक्षणानुसार, जयपूरमध्ये महिलांविषयक गुन्हेगारीचे प्रमाण अधिक आहे. चेन्नईत ते कमी आहे. सर्वाधिक साक्षर पुण्यात साक्षरतेचा विशेषत: महिला आणि पुरुष यामधील साक्षरतेच्या फरकाचा विचार करता जयपूरमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. तर कोलकात्यामध्ये हेच प्रमाण सर्वात कमी आहे. साक्षरतेचे सर्वाधिक प्रमाण हे पुण्यात आहे. तर हैदराबाद येथे मात्र हे प्रमाण कमी आहे. महिला बेरोजगारीत पाटणा पहिल्या क्रमांकावर आहे. पायाभूत तसेच इतर सेवासुविधा, वीज, पाणी, शिक्षण अशा अनेक बाबतीतही पाटणा पिछाडीवर आहे. 

टॅग्स :मुंबईभारत