मुंबई - विलेपार्ले येथील नानावटी रुग्णालयात ४१ वर्षीय रविकुमार मुक्कू या मेंदूमृत दात्याने अवयवदान करून पाच रुग्णांना शुक्रवारी जीवनदान दिले. रविकुमार यांना इतरांना मदत करायची सवय होती. त्याच्या या स्वभावाची घरातील सगळ्यांनाच जाण होती. त्यामुळे मेंदूमृत झाल्यानंतर सर्व कुटुंबीयांनी एकत्र येऊन अवयवदान करण्याचा निर्णय घेतला. मुंबई विभागातील हे २४ वे अवयवदान असून, यामधून हृदय, यकृत, स्वादुपिंड आणि दोन किडन्यांचे दान करण्यात आले.
चेंबूर येथील रहिवासी रविकुमार हे अंधेरीत एका खासगी कंपनीत कामाला होते. २९ मे रोजी त्यांना कार्यालयात चक्कर आल्यामुळे त्यांना उपचारासाठी सेवन हिल्स रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांना प्राथमिक उपचार देण्यात आले. मात्र, मेंदूचा सिटी स्कॅन केल्यानंतर त्यांची तब्येत अचानक बिघडली. त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान ५ जूनला त्यांना मेंदूमृत घोषित करण्यात आले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी पुढे येऊन अवयदानाचा निर्णय घेतला. मेंदूमृत व्यक्तीचे अवयव काढून घेण्याचा परवाना ‘सेवन हिल्स’कडे नसल्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांचे अवयवदान करण्यात आले.
‘रविकुमारचे कुटुंब म्हणून अभिमान’याप्रकरणी, रविकुमार यांचे भाऊ राजेश मुक्कू यांनी सांगितले की, आम्हाला अवयवदान या प्रक्रियेविषयी माहिती होती. त्यामुळे मेंदूमृत घोषित झाल्यानंतर डॉक्टरांना आम्हीच अवयवदान करण्याची इच्छा सांगितली. विशेष म्हणजे त्याकरिता आमची वहिनी आणि कुटुंबातील सगळ्या सदस्यांनी चर्चा घेऊन एकत्र निर्णय घेतला. माझ्या भावाला कायम इतरांना मदत करायची सवय होती. त्यामुळे शेवटच्या क्षणी जाता-जाता त्याने पाच रुग्णांना अवयव देऊन जीवनदान दिले. त्यामुळे रविकुमारचे कुटुंब म्हणून आम्हाला त्याचा अभिमान आहे.राज्यात गेल्या काही वर्षांत अवयव निकामी झालेल्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे अवयवांची गरज असणाऱ्या रुग्णांची मोठी प्रतीक्षा यादी आहे. मात्र, ज्या तुलनेत अवयवांची गरज आहे, त्या तुलनेत आपल्याकडे मेंदूमृत व्यक्तीचे अवयवदान होत नाही. याकरिता अवयवदान जनजागृतीची गरज असून, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातून यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत.