खारघर टोलनाक्याला विरोध
By Admin | Updated: May 31, 2014 02:10 IST2014-05-31T02:10:14+5:302014-05-31T02:10:14+5:30
पनवेल-सायन महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महामार्गावरील खारघर स्पॅगेटी येथे टोल उभारण्याचा घाट घातला आहे.

खारघर टोलनाक्याला विरोध
पनवेल : पनवेल-सायन महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महामार्गावरील खारघर स्पॅगेटी येथे टोल उभारण्याचा घाट घातला आहे. या टोलधाडीला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकू र यांनी विरोध दर्शविला आहे. हा निर्णय न बदलल्यास जनहितासाठी आंदोलन करावे लागेल असा इशारा त्यांनी थेट मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना दिला आहे. पनवेल-सायन महामार्गाचे रुंदीकरणाचे काम जवळपास संपत आले असून हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. हा महामार्ग दहा पदरी झाला असल्याने वाहने सुसाट वेगाने जातील असा दावा बांधकाम विभागाच्या अधिकार्यांनी केला आहे. प्रस्तावित आंतरराष्टÑीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर हे काम शासनाने हाती घेतले आहे. मानखुर्द ते कळंबोली अशा एकूण ६३ किमी अंतराचे रुं दीकरणाचे काम गेल्या पावणे दोन वर्षांपासून सुरू आहे. वाशी ते कामोठा असे एकूण पाच उड्डाणपूल उभारले जाणार असून डिसेंबर २०१४ पर्यंत रु ंदीकरणाचे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर खारघर येथे टोल वसूल करण्याकरिता टोल नाका उभारण्याचा प्रस्ताव आहे. पनवेल आणि सिडको वसाहतीतून दररोज हजारो लोक कामधंद्याकरिता मुंबई आणि ठाणे परिसरात जातात. त्यापैकी अनेकजण स्वत:ची वाहने वापरतात. त्याचबरोबर एसटी, एनएमएमटी, बेस्टनेही चाकरमानी प्रवास करतात. या महामार्गावरून जाता येताना सुमारे ६० रुपये भुर्दंड बसणार आहे. त्यामुळे बसचे तिकिट वाढवण्याची शक्यता असून त्याचा परिणाम प्रवाशांच्या खिशावर होणार आहे. वास्तविक पाहता मुंबई ते पुणे हे अंतर जलद गतीने कापता यावे याकरिता रस्त्यांची रुंदी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान मात्र स्थानिक रहिवाशांना सहन करावे लागणार आहे. या संदर्भात गेल्या काही महिन्यांपासून चर्चेला सुरुवात झाली आहे. खारघर ग्रामपंचायतीनेही या प्रस्तावाला विरोध केला आहेच. त्याचबरोबर आमदार प्रशांत ठाकूर या मुद्यावर आक्रमक झाले आहेत. स्थानिकांचा यामध्ये काहीच फायदा नसून त्यांनी पथकर का भरायचा असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. टोल नाक्याबाबत निर्णय घेतला तर त्याचा रोष लोकप्रतिनिधी आणि शासकीय यंत्रणेला सहन करावा लागेल याची जाणीव त्यांनी शासनाला करून दिली आहे. वाशी टोल नाक्यावर टोल आकारला जावा ज्यांना मुंबईला जायचे त्यांच्याकडून पथकर घेणे योग्य होईल. या निवेदनाची एक प्रत सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ व राज्यमंत्री रणजित कांबळे यांनाही देण्यात आली आहे. बीओटी तत्त्वावर रस्त्याचे रुंदीकरण सुरू असून स्थानिकांना याचा भुर्दंड बसू नये ही आमची मागणी आहे. त्याकरिता खारघर टोलनाक्याला विरोध आहे. जे मुंबईला जाताहेत त्यांच्याकडून शासनाने बिनधास्त टोल घ्यावा, अशी प्रतिक्रिया आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी दिली.