विरोधकांना भोवली विखारी टीका

By Admin | Updated: June 18, 2015 00:43 IST2015-06-18T00:43:59+5:302015-06-18T00:43:59+5:30

फाजील आत्मविश्वास,व्यक्तीद्वेष व विखारी टीका अशा कारणांमुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विरोधीपक्षाची वाताहात झाली.

Opponents scolded | विरोधकांना भोवली विखारी टीका

विरोधकांना भोवली विखारी टीका

दीपक मोहिते,  वसई
फाजील आत्मविश्वास,व्यक्तीद्वेष व विखारी टीका अशा कारणांमुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये विरोधीपक्षाची वाताहात झाली. सेनेच्या मंत्र्यांनी खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तीक टीका केल्यामुळे मतदारांनी आपला रोष मतदानयंत्रातून जाहीर केला. आजवर झालेल्या अनेक निवडणुकीतील प्रचारामध्ये असा प्रकार कधीच घडला नव्हता. त्यामुळे मतदारांनी सेना, भाजपला चांगला धडा शिकवला.
एकेकाळी नालासोपारा शहर हा सेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. त्या बालेकिल्ल्यातच मतदारांनी सेनेला धोबीपछाड दिली. तर वसई-विरार परिसरात सेनेला केवळ दोन जागा जिंकता आल्या. नालासोपारा शहरात त्यांच्या वाट्याला तीन जागा आल्या. भाजपाची अवस्था अत्यंत वाईट झाली. खासदार चिंतामण वनगा व पालकमंत्री विष्णू सवरा या दोघांना एकामागोमाग एक पराभवाचे धक्के बसले. आम्हाला मते द्याल तरच पाणीप्रश्न सोडविण्यासाठी केंद्र व राज्याकडून साडे तीन हजार कोटींचा निधी आणू अशी त्यांची मतलबी वक्तव्ये त्यांच्या पक्षाला भोवली.
जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्येही भाजपला वसई विरार परिसरात एकही जागा जिंकता आली नाही. तत्पूर्वी विधानसभा निवडणुकीतही युतीला पराभव चाखावा लागला. गेली अनेक वर्षे युतीची या उपप्रदेशात डाळ शिजत नाही. या निवडणुकीमध्ये भाजपच्या तिकिटावर विजयी झालेले किरण भोईर हे अनेक वर्षे बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक होते. त्यांनी लोकसभा निवडणुकीनंतर भाजपामध्ये प्रवेश केला. त्यांना मिळालेला विजय हा त्यांच्या वैयक्तीक कामांमुळे झाला आहे. माजी पेट्रोलियम मंत्री राम नाईक राजकीय विजनवासात गेल्यानंतर येथील भाजपाची घसरण झाली. ही घसरण खासदार चिंतामण वनगा व पालकमंत्री विष्णू सवरा थोपवू शकले नाहीत. आमदार हितेंद्र ठाकूर यांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतर ११० जागा जिंकू असा विश्वास व्यक्त केला होता. त्या विश्वासावर मतदारांनी शिक्कामोर्तब केले. तीन अपक्ष नगरसेवकांपैकी २ नगरसेवक हे बविआचेच आहेत. प्रभाग क्र. १११ मध्ये विजयी झालेले लॉरेल डायस हे अपक्ष म्हणून रिंगणात होते परंतु, ते बहुजन विकास आघाडीचे सक्रीय कार्यकर्ते आहेत. तर, प्रभाग क्र. ७४ मध्ये बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक किशोर धुमाळ यांच्या पत्नीला तिकिट नाकारल्यामुळे त्यांनी बंडखोरी केली व ५८७ मतांनी विजय मिळवला. हे दोघेही बहुजन विकास आघाडीमध्ये जाण्याची शक्यता आहे. गेल्यावेळी झालेल्या निवडणुकीतही बहुजन विकास आघाडीने ज्येष्ठ कार्यकर्ते डॉ. हेमंत पाटील यांना अपक्ष म्हणून रिंगणात उतरवले होते. पाच वर्षात झालेली विकासकामे, प्रचंड जनसंपर्क, केंद्र व राज्य सरकारकडून मिळविलेला आर्थिक निधी, मच्छीमार समाजासाठी उपलब्ध केलेल्या सोयीसुविधा व पाण्याच्या प्रश्नावर करण्यात येणाऱ्या उपाययोजना आदी कारणांमुळे शहरी व ग्रामीण भागात बहुजन विकास आघाडीला मतदारांनी डोक्यावर घेतले. या उलट विरोधीपक्षाने मात्र दहशतवाद, वैयक्तीक पातळीवर टीका व बेताल वक्त व्ये केल्यामुळे मतदार नाराज झाले.
विरोधीपक्षाच्या अनेक उमेदवारांवर अमानत रक्कम जप्त होण्याची नामुष्की आली. महानगरपालिकेच्या दोन्ही निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची पाटी कोरी राहीली. गेल्यावेळी बहुजन विकास आघाडीसमवेत काँग्रेस पक्षाने आघाडी केल्यामुळे त्यांच्या छाया पाटील व बीना फुर्ट्याडो या दोन महिला नगरसेविका निवडून आल्या. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस बरोबर आघाडी करून हात पोळल्यानंतर विधानसभा, जिल्हापरिषद, पंचायत समिती, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आदी निवडणुकांमध्ये आमदार हितेंद्र ठाकूर यांनी कोणत्याही पक्षाशी युती किंवा आघाडी करण्याचे टाळले. त्यामुळे त्यांना चांगले यश मिळाले परंतु त्याचबरोबर पूर्वीच्या सहयोगी पक्षांचे अस्तित्वच नामशेष झाले. केंद्रात व राज्यात भाजप मजबूत असताना मुंबईपासून अवघ्या ६० कि. मी. अंतरावर असणाऱ्या वसई तालुक्यात मात्र भाजपला आपली ताकद वाढवणे शक्य झाले नाही. सेनेला मात्र पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी अपशकुन केल्याचे झालेल्या मतदानावरुन स्पष्ट होत आहे.

Web Title: Opponents scolded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.