मुंबई- काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी निकालापूर्वीच एबीपी माझा या वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी अनेक मुद्द्यांवर परखड मतं व्यक्त केलीत. विशेष म्हणजे राज ठाकरेंबद्दलच्या विचारलेल्या प्रश्नावरही पृथ्वीराज चव्हाण यांनी सूचक विधान केलं आहे. राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांच्या मंचावर जाऊन स्वतःची प्रतिमा सुधारली होती. मोदींच्या हुकूमशाहीला राज ठाकरेंनी केलेला विरोध सर्वांनीच पाहिला आहे. कोणत्याही पक्षाबरोबर विचारांची बेरीज होणं गरजेचं असतं. सगळ्यांनी एकत्र येऊन लढणं आवश्यक असतं. 23ला कशा प्रकारे निकाल लागतील हे पाहू, नंतर ठरवू राज ठाकरेंना सोबत घ्यायचं की नाही, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत. ते म्हणाले, मोदींची पत्रकार परिषद होती की निरोप समारंभ होता हेच शेवटपर्यंत कळलं नाही. 5 वर्षांनंतरही मोदी पत्रकारांना सामोरे जात नाहीत. ईव्हीएमवर शंका असल्यानं व्हीव्हीपॅट मशिन वापरले. परंतु ईव्हीएमवर आमचा विश्वासच नाही. एक्झिट पोल करण्यासाठी भाजपानं किती पैसे दिले ते सांगावे. एक्झिट पोल करणाऱ्या संस्थांवर नियंत्रण आणावे. देशाच्या लोकशाहीला मोठा धोका निर्माण झाला आहे. सरकारनं कर्जमाफीचं फक्त गाजर दाखवलं. 2014पेक्षा काँग्रेसच्या जागा यंदा जास्त प्रमाणात वाढतील.
...तरच राज ठाकरेंना सोबत घेण्याचा विचार करू- पृथ्वीराज चव्हाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 16:07 IST