पाच कोटींचा प्रस्ताव पडला धूळखात
By Admin | Updated: May 6, 2015 01:07 IST2015-05-06T01:07:39+5:302015-05-06T01:07:39+5:30
रायगड जिह्यातील २३२ गावे पूररेषेमध्ये येत असून पूररेषा आणि आखणी सीमांकन करण्यासाठी चार कोटी ९९ लाख २१ हजार ४५१ रुपयांच्या निधीचा प्रस्ताव सरकारकडे २००९ रोजी पाठविला आहे.

पाच कोटींचा प्रस्ताव पडला धूळखात
आविष्कार देसाई, अलिबाग
रायगड जिह्यातील २३२ गावे पूररेषेमध्ये येत असून पूररेषा आणि आखणी सीमांकन करण्यासाठी चार कोटी ९९ लाख २१ हजार ४५१ रुपयांच्या निधीचा प्रस्ताव सरकारकडे २००९ रोजी पाठविला आहे. गेल्या पाच वर्षांत त्यावर कोणतीच कार्यवाही झाली नसून लालफितीत अडकलेली फाईल कधी मार्गी लागणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
रायगड जिल्ह्यात सुमारे साडेचार हजार मिलीमीटर पावसाची नोंद होते. एवढ्या प्रचंड प्रमाणात पाऊस पडत असल्याने जिल्ह्यातील नद्या, धरणे दुथडी भरून वाहत असतात. प्रचंड पावसाने नदीकाठच्या गावांनाच प्रथम पूराचा फटका बसतो. त्यामुळे जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात निर्माण होते. उपाय म्हणून कोणती गावे पूररेषेत येतात. यासाठी नदीकाठच्या गावांमध्ये ब्ल्यू अँड रेड लाइन आखली जाते. त्यामुळे धोक्याची पातळी समजून प्रशासनाला पुढील उपाययोजना करणे सोपे जाते. गेल्या पाच वर्षांत तसे झाले नसल्याने सुरक्षा रामभरोसे असल्याचे दिसून येते.
मान्सूनला काही दिवसांतच सुरुवात होणार असल्याने एवढ्या कमी वेळेत हे काम होणे शक्य होणार नसल्याचे चित्र आहे. त्याचप्रमाणे हा प्रस्ताव २००९ साली तयार केला होता. त्यात तब्बल दुपटीने वाढ होण्याची शक्यता असल्याने नव्याने प्रस्ताव करून तो मंजूर कधी होणार आणि प्रत्यक्ष काम कधी करणार, असा प्रश्न आहे. २००९च्या प्रस्तावाप्रमाणे निधी आला तर तुटपुंज्या निधीत ठराविक गावांमध्येच काम करता येऊ शकते, परंतु उर्वरित गावात होणार नसल्याने त्याला काहीच अर्थ राहणार नसल्याचे बोलले जाते. दरम्यान, याबाबतची नेमकी माहिती घेण्यात येत असून, ती प्राप्त होताच निश्चित माहिती देता येईल, असे जिल्हाधिकारी सुमंत भांगे यांनी सांगितले.
पेण तहसील कार्यालयात आपत्ती व्यवस्थापन प्रात्यक्षिक
१ पेण : येऊ घातलेल्या मान्सून हंगामात उद्भवणाऱ्या संभाव्य नैसर्गिक आपत्ती व संकटाचा सामना करण्याकरिता प्रासंगिक मदत वेळेवर मिळावी याची पूर्वतयारी म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय रायगड अलिबाग यांच्यातर्फे पेण तहसीलदार कार्यालयाच्या सभागृहात मंगळवारी आपत्ती व्यवस्थापनाच्या मास्टर ट्रेनरनी आपत्ती निवारणविषयक शिबिरार्थिंना केले.
२ पेण शहर व ग्रामीण परिसराला अंबा, भोगावती, बाळगंगा, पाताळगंगा या नद्यांचा प्रवाह मान्सून हंगामात केव्हाही धोकादायक ठरू शकतो. या नद्यांचा प्रवाह पश्चिमेकडील धरमतर खाडीला मिळतो. अतिवृष्टीसमयी उधाणभरतीच्या पाच मीटर उसळणाऱ्या लाटा व नद्यांनी ओलांडलेली धोक्याची पातळी अशी भयाण परिस्थिती उद्भवते व नैसर्गिक आपत्ती येऊन पूरपरिस्थितीचा सामना करावा लागतो. यावेळी अस्ताव्यस्त झालेले जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन मदतीची तातडीची आवश्यकता भासते. १९८९, २००५ या महापुराच्या आठवणी जुलै महिन्यात स्थानिक नागरिकांच्या मनात जागृत होतात.
३ गतकालीन परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा गेल्या दशकभरात सतर्क झाली आहे. मान्सूनपूर्व परिस्थितीची चाचपणी म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी या मदतकार्याची प्रात्यक्षिके पोलीस कर्मचारी, महसूल कर्मचारी, स्थानिक महिला-पुरु ष, स्वंयसेवी संस्थांचे स्वयंसेवक व शासनाच्या इतर विभागातील कर्मचारीवर्गाला हे प्रशिक्षण दिले जाते. कार्यशाळेत जखमींना स्ट्रेचरवर उचलण्याच्या विविध प्रकार, आत्मसंरक्षण, धाडसीपणा व संघटन कौशल्य ही प्रात्यक्षिके सादर करण्यात आली. ही कार्यशाळा दोन दिवस चालणार आहे.