Join us  

आता तरी घरी बसा; मुंबई पोलिसांचा लाँग मार्च

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2020 1:22 AM

जमावबंदी । डीजे, लाउडस्पीकर, फटाक्यांच्या आतषबाजीवर निर्बंध

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : शहरात कोरोनाचे वाढते संकट, त्यात पोलिसांवर होणारे हल्ले लक्षात घेता मुंबईपोलिसांकड़ून लाँग मार्चद्वारे शक्तिप्रदर्शन करत नागरिकांना घरात राहण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. तसेच पुढील तीन दिवसांत कारवाईचा वेग आणखीन वाढणार आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत जमावबंदी आणि संचारबंदीचे आदेश आणखी कडक केले आहेत. सोबतच पोलिसांनी डीजे, लाउडस्पीकर, म्युझिक सिस्टीम, फटाक्यांच्या आतषबाजीवर बंदी घालण्यात आली आहे.

शहरात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढतच असल्याने पोलिसांनी भाजीपाला आणि फळविक्रीवर निर्बंध घातले आहेत. अशातच तरीही मुंबईकर मोठ्या प्रमाणात विनाकारण बाहेर पडत आहेत. यांच्यावर कारवाई होत असताना पोलिसांवर हात उचलण्याच्या घटनाही समोर आल्या. त्यांच्यावर वचक बसावा, तसेच नागरिकांनी कोरोनाविरुद्धच्या लढाईत घरूनच सहकार्य करावे यासाठी पोलीस ठाणेस्तरावर लाँग मार्च काढण्यात येत आहे. शनिवारी आग्रीपाडा पोलिसांकड़ूनही सात रस्त्यासह संपूर्ण परिसरात लाँग मार्च काढण्यात आला. यात आरोग्य विभागाचेही पथक सहभागी झाले होते. नागरिकांना घरात राहूनच सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. शिवाय विनाकारण भटकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेतही यावेळी देण्यात आले.यातच १४ एप्रिलला महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरातच राहून साजरी करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई पोलिसांनी शनिवारी मध्यरात्रीपासून १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत जमावबंदी आणि संचारबंदीचे आदेश आणखी कडक केले आहेत. सोबतच पोलिसांनी डीजे, लाउडस्पीकर, म्युझिक सिस्टीम, फटाक्यांची आतषबाजी यावर निर्बंध घातले आहेत. मुंबई पोलीस दलाचे पोलीस उपायुक्त (अभियान) प्रणय अशोक यांनी शनिवारी हे आदेश जारी केले.मुंबईत गुन्ह्यांचा आकडा साडेचार हजारांवरशुक्रवारी ४९७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करत ३११ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंतच्या कारवाईत आरोपींचा आकडा साडेचार हजारांवर पोहोचला आहे. कोरोना संशयितांविरुद्ध दहा गुन्हे दाखल झाले आहेत. तर, हॉटेल आस्थापना २९, पान टपरी २९, इतर दुकाने हॉकर्स/ फेरीवाले ३५, सार्वजनिक ठिकाणी गर्दी केल्याप्रकरणी १७०९, तर अवैध वाहतूक प्रकरणी ५५८ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. ६ एप्रिलपासून मुंबईत कारवाईचा वेग वाढला असून दिवसाला ४०० हून अधिक जणांवर कारवाई करण्यात येत आहे.

टॅग्स :मुंबईपोलिसकोरोना वायरस बातम्या