Join us

उत्तर मुंबईत एकही झोपडी नव्याने उभी राहता कामा नये; पीयूष गोयल यांचे पालिकेला निर्देश; ९१ झोपडीधारकांना घर वाटप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 15:17 IST

...पात्र झोपडपट्टीधारकांना हक्काची घरे मिळण्यासाठी वेगाने प्रयत्न केले पाहिजेत, तसेच यापुढे उत्तर मुंबईत एकही नवीन झोपडी उभारली जाता कामा नये आणि कोणी अनधिकृत बांधकाम केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करावी, असे निर्देश केंद्रीय मंत्र्यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले.

मुंबई : बोरिवली पश्चिमेकडील पालिकेच्या आर/मध्य विभाग कार्यालयात केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते महात्मा फुलेनगरातील ९१ पात्र झोपडीधारकांना पुनर्वसन योजनेतील सदनिकांचे वाटप करण्यात आले. पात्र झोपडपट्टीधारकांना हक्काची घरे मिळण्यासाठी वेगाने प्रयत्न केले पाहिजेत, तसेच यापुढे उत्तर मुंबईत एकही नवीन झोपडी उभारली जाता कामा नये आणि कोणी अनधिकृत बांधकाम केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करावी, असे निर्देश केंद्रीय मंत्र्यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले.याप्रसंगी आमदार संजय उपाध्याय, माजी खासदार गोपाळ शेट्टी, परिमंडळ ७च्या उपायुक्त डॉ. भाग्यश्री कापसे, आर/मध्य विभागाच्या सहायक आयुक्त संध्या नांदेडकर, झोन ७च्या अधिकारी भाग्यश्री कापसे यांच्यासह स्थानिक नगरसेवक व अन्य मान्यवर उपस्थित होते. प्रत्येक व्यक्तीला आपल्या मुलांचे संगोपन पक्क्या घरात करायचे असते. त्यामुळे झोपडपट्टी पुनर्वसनाची प्रक्रिया गतिमान होण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करावे.  तसेच, बाहेरचा कोणी या भागात येणार नाही आणि येथील रहिवाशांना अन्यायाने बाहेर फेकले जाणार नाही, याची खबरदारी घ्यावी.

माझ्या नावाचा गैरवापर केल्यास तक्रार करा!माझ्या नावाचा वापर करून कोणी चुकीचे काम करण्यास सांगितले, तर स्पष्ट नकार द्या. लोककल्याण कार्यालयात त्याची तक्रार थेट करा, असेही गोयल म्हणाले.

अधिकाऱ्यांवर कारवाई! नवीन झोपड्या उभ्या राहणार नाहीत, याबाबत अधिकाऱ्यांनी दक्षता न घेतल्यास त्यांच्या विरोधात कारवाई केली जाईल. अधिकृत फेरीवाल्यांना संधी द्या, मात्र अनधिकृत फेरीवाल्यांवर कठोर कारवाई करा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

 

टॅग्स :पीयुष गोयलमुंबई महानगरपालिका