आता माळवासियांना मुबलक पाणी
By Admin | Updated: May 31, 2015 22:38 IST2015-05-31T22:38:38+5:302015-05-31T22:38:38+5:30
मागील महिन्यात कसाऱ्याजवळील माळ या गावात पाण्यासाठी विहिरीवर गेलेल्या मनिषा दादू वारे या १२ वर्षीय मुलीचा पाणी काढताना मृत्यू झाला होता

आता माळवासियांना मुबलक पाणी
श्याम धुमाळ, कसारा
मागील महिन्यात कसाऱ्याजवळील माळ या गावात पाण्यासाठी विहिरीवर गेलेल्या मनिषा दादू वारे या १२ वर्षीय मुलीचा पाणी काढताना मृत्यू झाला होता. नंतर पालकमंत्री एकनाथ श्ंिदे यांनी या गावाला भेट देऊन वारे कुटुंबियांचे सांत्वन करून गावकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी माळ गावात रिलॅक्स कॉऊंट्री या सेकंड होम कंपनीसह अनेक मोठमोठे प्रोजेक्ट सुरु असून प्रोजेक्टवाल्यांकडे मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असून या व्यावसायिक ठेकेदारांच्या प्रोजेक्टमध्ये बंधारे, तलाव, विहिरी अवैधरित्या कार्यरत असून त्यात मुबलक पाणी आहे. परंतु ते पाणी गावकऱ्यांना मिळत नसल्याची कैफियत पालकमंत्र्यांसमोर मांडल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहापूर तहसिलदार अविनाश कोष्टी यांना संबंधीत ठेकेदारांच्या कामाबाबत चौकशीचे आदेश देऊन सदर सेकंड होम कंपनी मार्फत गावकऱ्यांना पाणी उपलब्ध होईल याबाबत प्रयत्न करण्यास सांगितले. पालकमंत्र्यांच्या आदेशाची गंभीर दखल घेऊन तहसिलदारांनी रिलॅक्स काऊंट्री या विकासकास सदर प्रकरणी कारवाईचे संकेत दिल्यानंतर विकासक कंपनीने माळच्या ग्रामस्थांसाठी पाणी देण्याचे मान्य करून गावात व लगतच्या तोरणपाडा येथे दोन विहीरी बांधून देण्याचे आश्वासन दिले. त्या आश्वासनाची पुर्तता करून रिलॅक्स काऊंट्रीचे राजेंद्र पाटील यांनी शनिवारी माळ गावातील दोन विहिरींच्या कामाला सुरुवात केली. याचा शुभारंभ शहापूर तहसिलदार अविनाश कोष्टी व आमदार पांडुरंग बरोरा यांच्या हस्ते करण्यात आल्या. यावेळी संतोष कर्डक, सरपंच गोविंद झुगरे उपस्थित होते.