थकबाकी प्रकरणी जप्तीच्या नोटिसा
By Admin | Updated: March 23, 2015 22:49 IST2015-03-23T22:49:02+5:302015-03-23T22:49:02+5:30
मालमत्ताकराच्या थकबाकी प्रकरणी केडीएमसीचे आयुक्त मधुकर अर्दड यांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे.

थकबाकी प्रकरणी जप्तीच्या नोटिसा
कल्याण : मालमत्ताकराच्या थकबाकी प्रकरणी केडीएमसीचे आयुक्त मधुकर अर्दड यांनी कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली आहे. थकबाकीदारांचे पाणी कनेक्शन खंडित करण्याबरोबरच विकासकांना जप्तीच्या नोटिसा बजावण्यास सुरुवात केली असून मालमत्ताकराच्या रकमेची वसुली झाल्याशिवाय नवीन बांधकाम परवानगी किंवा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला देऊ नये, असे त्यांनी आदेशित केले आहे.
मालमत्ताकराच्या रकमा वसूल करण्याकामी केडीएमसीने ५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी या कालावधीत अभय योजना राबविली. या योजनेंतर्गत सुमारे ९८ कोटींची रककम वसूल करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घ्या, असे आवाहन संबंधित कर विभागाकडून करण्यात आले होते. तसेच योजनेनंतर थकबाकीदारांविरोधात ठोस कारवाईची पावले उचलली
जातील, असेही स्पष्ट करण्यात आले होते. त्याप्रमाणे कारवाईला प्रारंभ झाला असून याअंतर्गत आतापर्यंत ३४४ पाणीकनेक्शन खंडित करण्यात आले, तर १४ विकासकांना मालमत्ताजप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
नोटिसा बजावण्यात आलेल्यांमध्ये निर्मल लाइफ स्टाइल, सचिन देशमुख, सुरेश वाधवा, श्रीकांत शितोळे, जोहर झोजवाला, अंजना चव्हाण, कुंडलिक मिरकुटे, राईसी डेव्हलपर्स, मनोजकुमार पुनामिया व लता पुनामिया, संदीपकुमार सिंग, शंकर गोविंदा म्हात्रे, अशोक शिंदे, मोहम्मद युसुफ अशा मोठ्या विकासकांचा समावेश आहे. कराच्या रकमा लवकरात लवकर भरा आणि जप्तीची कारवाई टाळा, असे आवाहन कर विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)