‘त्या’ टँकरची चौकशीच नाही
By Admin | Updated: December 6, 2014 00:33 IST2014-12-06T00:33:21+5:302014-12-06T00:33:21+5:30
ज्या दिवशी वालधुनी नदीत वायुबाधेचा प्रकार घडला, त्याच दिवशी उल्हासनगर गुन्हे शाखेने दोन टँकर ताब्यात घेऊन अंबरनाथ पोलिसांकडे दिले होते.

‘त्या’ टँकरची चौकशीच नाही
अंबरनाथ : ज्या दिवशी वालधुनी नदीत वायुबाधेचा प्रकार घडला, त्याच दिवशी उल्हासनगर गुन्हे शाखेने दोन टँकर ताब्यात
घेऊन अंबरनाथ पोलिसांकडे दिले होते.
मात्र, या दोन टँकरची कोणतीही चौकशी करण्यात आली नाही. या प्रकारावरून पोलीस यंत्रणेत समन्वयाचा अभाव असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
गेल्या आठवड्यात वालधुनी नदीत टँकरद्वारे केमिकल सोडल्याने या परिसरातील नागरिकांना वायुबाधा झाली होती. या प्रकारानंतर लागलीच उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाने एमएच ०४ एएम १२०९ आणि एमएच ०४ एफ ८५९४ हे दोन केमिकलचे टँकर चालकांसह ताब्यात घेतले होते. गुन्हा अंबरनाथ पोलीस ठाण्यात असल्याने हे दोन्ही टँकर अंबरनाथ पोलिसांकडे देण्यात आले. यासंदर्भात उल्हासनगर गुन्हे अन्वेषण विभागाने अधिकृत माहिती दिली आहे. मात्र, या टँकरसंदर्भात अंबरनाथ पोलिसांना विचारले असता आम्हाला असे कोणतेही टँकर मिळाले नाहीत, अशी माहिती दिली. पोलीस खात्यातील दोन विभागांमध्ये समन्वय नसल्याचे या प्रकारावरून स्पष्ट होत आहे.
टँकरचालकांची चौकशी करणे तर दूरच, हे दोन्ही टँकर आमच्याकडे आलेच नाहीत, असे तपास अधिकारी म्हणत असल्याने पोलिसांना या वायुबाधेच्या तपासात गांभीर्य नसल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)