प्यारी नाही आयुष्मानची बिंदू
By Admin | Updated: May 13, 2017 01:07 IST2017-05-13T01:07:52+5:302017-05-13T01:07:52+5:30
बॉक्स आॅफिसवर अजूनही ‘बाहुबली-२’चे घमासान सुरू असताना आज रीलीज झालेला यशराज फिल्म्सचा ‘मेरी प्यारी बिंदू’ हा रोमॅण्टिक लव्हस्टोरी

प्यारी नाही आयुष्मानची बिंदू
बॉक्स आॅफिसवर अजूनही ‘बाहुबली-२’चे घमासान सुरू असताना आज रीलीज झालेला यशराज फिल्म्सचा ‘मेरी प्यारी बिंदू’ हा रोमॅण्टिक लव्हस्टोरी चित्रपट कितपत तग धरेल याविषयी साशंकता निर्माण केली जात होती. परंतु चित्रपटात अभिनेता आयुष्मान खुराणा आणि बऱ्याच काळानंतर कमबॅक करणारी अभिनेत्री परिणिती चोप्रा यांच्यातील रंगलेली केमिस्ट्री हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर काहीसा करिष्मा करेल, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मात्र ज्या प्रेक्षकांना अॅक्शनपटांचे आकर्षण आहे, अशा प्रेक्षकांची या सिनेमातून घोर निराशा होईल यात काही शंका नाही.
चित्रपटात कोलकात्याचा राहणारा लेखक अभिमन्यू रॉय उर्फ बुबला (आयुष्मान खुराणा) आणि बिंदू (परिणिती चोप्रा) यांची लव्हस्टोरी दाखविण्यात आली आहे. हे दोघे लहानपणापासून एकमेकांवर प्रेम करीत असतात. बिंदू ही अभिमन्यूची शेजारीण असते. पुढे दोघेही एकाच कॉलेजात शिक्षण घेत असल्याने त्यांच्यातील प्रेम बहरत जाते. कॉलेज लाइफमध्येच हे दोघे त्यांच्या करिअरचे क्षेत्र निश्चित करीत असतात. बिंदूला गायक व्हायचे असते, तर अभिमन्यूला लेखक म्हणून काम करायचे असते. एकेदिवशी अपघातात बिंदूच्या आईचे निधन होते. या दुर्घटनेला ती तिच्या वडिलांना जबाबदार धरते. पुढे ती आॅस्ट्रेलियाला निघून जाते. अभिमन्यू मात्र कायम तिच्या संपर्कात असतो. अभिमन्यूही करिअरसाठी कोलकात्यातून गोवा अन् त्यानंतर मुंबईला शिफ्ट होतो. एकेदिवशी अचानकपणे अभिमन्यूला बिंदू गोव्यात दिसते. पुन्हा या दोघांमध्ये प्रेम बहरते. अखेर धाडस करून अभिमन्यू बिंदूला प्रपोज करतो. मात्र त्याच्याशी लग्न करण्यास ती नकार देते. अशात अभिमन्यूला त्याचे प्रेम मिळणार काय? हा प्रश्न अखेरपर्यंत मनाला उत्सुकता लावणारा ठरतो.
चित्रपटात आयुष्मान आणि परिणिती यांनी अतिशय सुरेख पद्धतीने भूमिका साकारल्या आहेत. या लव्हस्टोरीला काहीसा कॉमेडीने स्पर्श केल्याने प्रेक्षकांना चित्रपट बघताना फारसा कंटाळा येत नाही. तसेच किशोरकुमार, रफी साहब, लता मंगेशकर, आर.डी. बर्मन यांनी गायलेल्या गाण्यांबरोबरच हिंदी-बंगाली लिरिक्सचाही चित्रपटात अतिशय खुबीने वापर केल्याचे दिसून येते. त्याशिवाय लोकेशन्स, सिनेमॅटोग्राफी, कॅमेरावर्क उत्तम असल्याचे दिसून येते. परंतु सुरुवातीपासूनच आयुष्मानच्या तोंडून फ्लॅशबॅकची कथा सांगितली जात असल्याने बऱ्याचदा प्रेक्षकांचा गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण ८०च्या दशकातील लव्हस्टोरी दाखविताना मनात बरेच प्रश्न निर्माण होतात. शिवाय चित्रपटात प्रेम, साखरपुडा, लग्न या शब्दांचा वारंवार वापर केला गेल्याने, ‘एकदाचं लग्न कराच’ असा संतापजनक प्रश्न प्रेक्षकांकडून उपस्थित होण्याची दाट शक्यता आहे. इतर कुठल्याही पात्राभोवती चित्रपट फिरत नसल्याने दोघांनाच पडद्यावर बघताना कंटाळा येतो. एकंदरीतच दिग्दर्शक अक्षय रॉय यांनी पहिल्याच चित्रपटात प्रतिष्ठा पणाला लावताना प्रेक्षकांना पुन्हा एकदा रोमॅण्टिक लव्ह स्टोरीकडे वळविण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटातील अभिमन्यूला त्याचे प्रेम मिळणार काय? या प्रश्नाची चित्रपटाच्या अखेरच्या क्षणापर्यंत उत्सुकता राहते.
-सतीश डोंगरे