Join us  

नोटाबंदी पूर्णपणे फसली, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2017 6:42 PM

नरेंद्र मोदी यांची नोटाबंदी संपूर्णतः फेल झालेली आहे. ५०० व १००० च्या नोटा बंद करून २००० च्या नोटा आणून भ्रष्टाचार वाढवला आहे. 

मुंबई - नरेंद्र मोदी यांची नोटाबंदी संपूर्णतः फेल झालेली आहे. ५०० व १००० च्या नोटा बंद करून २००० च्या नोटा आणून भ्रष्टाचार वाढवला आहे. पनामा आणिपॅराडाईस पेपर मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहकारी आणि भाजपा सरकारचे लोक असल्यामुळेच नरेंद्र मोदी या प्रकरणांची चौकशी आणि कारवाई करत नाही आहेत. “ना खाउंगा  ना खाने दुंगा” बोलणारे नरेंद्र मोदी स्वतः भ्रष्टाचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहत आहेत. जय अमित शहा याची चौकशी का केली जात नाही ? कारण त्यामध्ये सर्व अमित शहांचा पैसा आहे, अशी घणाघाती टीका मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केली आहे.  

निरुपम म्हणाले," गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर, २०१६ रोजी रात्री ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटबंदी सारखा अत्यंत अघोरी निर्णय जाहिर केला आणि संपूर्ण भारत देशात एकच खळबळ उडाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी नोटाबंदी जाहिर करताना म्हणाले होते की नोटाबंदीमुळे आपल्या देशातील भ्रष्टाचार, काळा पैसा, आतंकवाद, खोटया नोटा हे सगळे बंद होईल, पण यापैकी कोणतेच ध्येय्य साध्य झालेले नाही. याउलट संपूर्ण गरीब जनता व सर्व सामान्य माणूस देशोधडीला लागला. स्वतःचेच कष्टाचे पैसे काढताना जनतेचे हाल झाले. ११५ जणांना आपले प्राण गमवावे लागले. या अत्यंत अघोरी निर्णयाला १ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल या निर्णयाचा मी निषेध करतो." 

नोटाबंदीचा करण्यासाठी काँग्रेसतर्फे संपूर्ण देशात “काळा दिवस” पाळण्यात आला. तसेच नोटबंदीमुळे मृत्युमुखी पडलेले निष्पाप लोकांसाठी भाजपा सरकारचे आझाद मैदानात आज विधी करण्यात येत येत आहे. निरुपण पुढे म्हणाले," पनामा आणि पॅराडाईस पेपर मध्ये महानायक अमिताभ बच्चनचे नाव आले आणि अमिताभजी भाजपाचे ‘‘सदिच्छा दूत’’ आहेत. नरेंद्र मोदी यांचे नाव सहारा व बिर्ला डायरी मध्ये होते, त्याची चौकशी झालेली नाही. नरेंद्र मोदी यांचे सर्व सहकारी भ्रष्टाचारामध्ये अडकलेले आहेत पण त्यांची चौकशी किंवा त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. परंतु व्यापारी आणि उद्योजक यांच्या मागे सीआयडी, इडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांचा ससेमिरा मागे लावतात. भ्रष्टाचाराविरोधात बोलणारे अधिकारी चौकशी आणि कारवाईच्या फेऱ्यात अडकतात." "नोटाबंदीमुळे अनेक तरुण बेरोजगार झालेले आहेत, अनेक उद्योगधंदे बंद पडले, जीडीपी घसरला, आतंकवाद वाढला, रोज भारताच्या सीमेवर आपले जवान शहीद होत आहेत. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशाची जाहीरपणे माफी मागावी, असे उद्गार मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी पुढे काढले.आज काँग्रेसतर्फे ८ नोव्हेंबर “काळा दिवस” आणि भाजपा सरकारचे “श्राद्ध” घालण्याचा कार्यक्रम घेण्यात आला.  या कार्यक्रमाला खासदार हुसेन दलवाई आणि रजनी पाटील, माजी खासदार एकनाथ गायकवाड आणि भालचंद्र मुणगेकर, माजी मंत्री सुरेश शेट्टी आणि चंद्रकांत हंडोरे, माजी आमदार चरणसिंग सप्रा, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस भूषण पाटील आणि संदेश कोंडविलकर, सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी तसेच शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :नोटाबंदीसंजय निरुपम