Join us

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको: नवाब मलिकयांनी मांडली राष्ट्रवादीची भूमिका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 08:36 IST

न्यायालयीन लढाईची जबाबदारी छगन भुजबळ यांच्यावर

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको, ही राष्ट्रवादीची भूमिका आहे. याबाबतचा न्यायालयीन लढा लढण्याची जबाबदारी मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आली आहे, अशी माहिती पक्षाचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पक्षाच्या मंत्र्यांची व नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांनी ही माहिती दिली. ओबीसींचे आरक्षण अबाधित राहिले पाहिजे, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाशिवाय निवडणुका नकोत ही पक्षाची सुरुवातीपासून भूमिका आहे आणि तीच कायम राहील, असेही मलिक यांनी सांगितले. 

कोरोनामुळे  सार्वजनिक कार्यक्रम रद्दराज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने चिंता वाढली आहे. त्यामुळेच पक्षाने नियोजित शिबिर व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत. गर्दी होणार नाही असे कुठलेही कार्यक्रम मंत्री किंवा नेत्यांनी घेऊ नयेत असा निर्णय बैठकीत झाल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. मंत्री आणि पालकमंत्री व संपर्कमंत्री त्या-त्या जिल्ह्यात जाऊन पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून माहिती घेतील. पक्षांतर्गत होणाऱ्या निवडणुकीसाठी होणारी सदस्य नोंदणी कार्यक्रमाचीही चर्चा यावेळी झाली. आगामी ज्या निवडणुका होणार आहेत त्याची तयारी पक्षाने केली आहे, असेही मलिक यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :नवाब मलिकओबीसी आरक्षण