Join us  

JNU Protest : भारताला बदनाम करण्याचा प्रयत्न नाही ना? देवेंद्र फडणवीस यांचा JNU वर सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 8:31 PM

JNU Protest : दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने पत्रकार परिषद घेऊन जेएनयु हल्ल्यासंदर्भात माहिती दिली.

मुंबई - जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) हिंसाचाराच्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी हल्लेखोरांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. त्यामध्ये पोलिसांना नऊ जणांची ओळख पटली असून जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आइशी घोषसह जेएनयूचा माजी विद्यार्थी चुनचुन कुमार, सुचेता आणि प्रिया रंजन यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांच्या या खुलाशानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जेएनयुतील हल्ल्याबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे.

दिल्ली पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाने पत्रकार परिषद घेऊन जेएनयु हल्ल्यासंदर्भात माहिती दिली. त्यावर बोलताना, ''दिल्ली पोलिसांनी जेएनयूतील हल्ल्यासंदर्भात हल्लेखोरांचे अनेक छायाचित्र आणि महत्त्वपूर्ण पुरावे जारी केल्याने या हल्ल्यामागे कोण आहेत, हे स्पष्ट झाले आहे. आपल्या विद्यापीठांना केवळ राजकीय स्वार्थासाठी युद्धाची मैदानं डावे घडवू पाहत आहेत,'' असे फडणवीस यांनी म्हटलंय. 

तसेच भारत आज लक्षणीय प्रगती करत असून संपूर्ण जगात भारताचा नावलौकिक वाढतो आहे. त्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी आणि भारताला बदनाम करण्यासाठी तर हे प्रयत्न होत नाही ना? जेएनयूच्या कुलगुरुंच्या घरावर हल्ला, अधिष्ठात्यांवर हल्ला, त्यांना वैद्यकीय मदतीची गरज असताना सुद्धा ती न मिळू देणे, महिला प्राध्यापकांना अपहृत करून ठेवणे, सर्व्हर रूममध्ये जाऊन इंटरनेट बंद पाडणे, परीक्षांसाठी नोंदणी न करू देणे यातून कोणता उद्देश निदर्शनास येतो? असा प्रश्नच फडणवीस यांनी विचारल आहे. फडणवीस यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरुन जेएनयुतील घटनेवर भाष्य केले. 

 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसजेएनयूविद्यापीठभाजपा