एनएमएमटीला रोज आठ लाखांचा तोटा
By Admin | Updated: January 9, 2015 00:12 IST2015-01-09T00:12:53+5:302015-01-09T00:12:53+5:30
महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाचा (एनएमएमटी) तोटा दिवसेंदिवस वाढत आहे.

एनएमएमटीला रोज आठ लाखांचा तोटा
नामदेव मोरे - नवी मुंबई
महानगरपालिकेच्या परिवहन उपक्रमाचा (एनएमएमटी) तोटा दिवसेंदिवस वाढत आहे. सद्य:स्थितीत रोज सरासरी ८ लाख २२ हजार रुपयांचे नुकसान होत आहे. वाढणारा तोटा भरून काढण्याचे आव्हान उपक्रमासमोर उभे ठाकले आहे.
नवी मुंबईमधील नागरिकांना चांगली वाहतूक सेवा देण्यासाठी महानगरपालिकेने स्वत:ची परिवहन सेवा सुरू केली. परंतु ढिसाळ व्यवस्थापनामुळे २० वर्षांत उपक्रम डबघाईला आला आहे. येथील कारभारावर कोणाचेही नियंत्रण राहिलेले नाही. सद्य:स्थितीत ४७ मार्गांवर ३१० बसेस धावतात. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, उरण, पनवेलपर्यंत एनएमएमटीच्या बसेस धावत आहेत. परंतु बसेसच्या उत्पन्नापेक्षा खर्च वाढू लागला आहे. शिवसेना नगरसेविका कोमल वास्कर यांनी नुकत्याच झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये उपक्रमाचे उत्पन्न व खर्च याविषयी प्रश्न विचारला होता. आयुक्तांनी दिलेल्या उत्तरात धक्कादायक माहिती समोर आली आहे. उपक्रमास जाहिरात, प्रवासी भाडे व इतर मार्गांनी रोज २७ लाख २५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. परंतु डिझेल, सीएनजी, दुरुस्ती, वेतन व इतर कारणांसाठी रोज सरासरी ३५ लाख ४७ हजार रुपयांचा खर्च होत आहे.
एनएमएमटीला रोज किमान ८ लाख २२ हजार रुपयांचा तोटा होत आहे. महिन्याला जवळपास अडीच कोटी व वर्षाला जवळपास २४ कोटी रुपयांचा तोटा होत आहे.
उपक्रमाने बस शेल्टर बीओटी तत्त्वावर विकसित केले आहेत. त्यावरील जाहिरातीपोटी महिन्याला २ लाख ६६ हजार रुपयांचे
उत्पन्न मिळते. बसवरील जाहिरातीसाठी महिन्याला जवळपास १३ लाख ६८ हजार रुपयांचे उत्पन्न मिळते. खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ बसत नसल्यामुळे नुकसान वाढत आहे. वाढणारे नुकसान कमी करण्यासाठी १५ दिवसांपूर्वी तत्कालीन आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी तुर्भे डेपोत बैठक घेऊन महत्त्वाच्या सूचना केल्या होत्या. त्यांची बदली झाली असून नवीन आयुक्तांसमोरही तोटा भरून काढण्याचे आव्हान आहे. ते उपक्रमाकडे लक्ष देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उत्पन्नवाढीकडे दुर्लक्ष : एनएमएमटी प्रशासन उत्पन्नवाढीकडे दुर्लक्ष करत आहे. तोटा कमी करण्यासाठी विशेष प्रयत्न होत नाही. उपक्रमाचा महापे डेपो धूळ खात पडून आहे. या सर्वांमुळे तोटा वाढत आहे. ठोस नियोजन केले नाही तर सिडकोच्या परिवहन उपक्रमाप्रमाणे एनएमएमटीची स्थिती होईल, अशी भीती व्यक्त होत आहे.