एनएमएमटीच्या ताफ्यात ४० नवीन व्हॉल्वो बसेस
By Admin | Updated: August 16, 2014 00:23 IST2014-08-16T00:23:59+5:302014-08-16T00:23:59+5:30
महापालिकेच्या परिवहन उपक्रमात नव्या ५० गाड्या दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये ४० वातानुकूलित व्हॉल्वो बस असून १० साध्या बस आहेत
एनएमएमटीच्या ताफ्यात ४० नवीन व्हॉल्वो बसेस
नवी मुंबई : महापालिकेच्या परिवहन उपक्रमात नव्या ५० गाड्या दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये ४० वातानुकूलित व्हॉल्वो बस असून १० साध्या बस आहेत. नऊ मार्गावर या गाड्या चालवल्या जाणार असून स्वातंत्र्यदिनाचे औचित्यावर गाड्यांचे उद्घाटन करण्यात आले.
परिवहन उपक्रमातर्फे सध्या नवी मुंबईसह पनवेल, मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली या मार्गावर बस चालविल्या जात आहेत. त्याकरिता परिवहनच्या ताफ्यात सध्या ३२० बसेस आहेत. त्यात अधिक ५० गाड्यांची भर पडली आहे. त्यामध्ये ४० वातानुकूलित बसेस आहेत. जेएनएनयूआरएमच्या योजनेअंतर्गत ह्या बस परिवहन उपक्रमाने घेतल्या आहेत, तर इतर १० मिनी बस ह्या महापालिकेच्या अनुदानातून घेण्यात आल्या आहेत. त्यानुसार या एकूण ५० गाड्या नुकत्याच परिवहन उपक्रमात दाखल झाल्या आहेत. या गाड्यांचे उद्घाटन शुक्रवारी स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यावर पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी महापौर सागर नाईक, आमदार संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक, परिवहन सभापती गणेश म्हात्रे, परिवहन व्यवस्थापक शिरीष आरदवाड आदी उपस्थित होते. या बस खरेदीसाठी केंद्राकडून ५० टक्के, राज्य शासनाकडून ३० टक्के निधी मिळालेला आहे. तर २० टक्के निधी हा महापालिकेने खर्च केलेला आहे. त्यानुसार नव्या ९ मार्गावर या बस चालवल्या जाणार आहेत. या नव्या मार्गामध्ये बेलापूर ते मुंबईचे आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाशी स्थानक ते बोरीवली (ठाणे मार्गे), एपीएमसी ते अंधेरी लोखंडवाला या प्रमुख वातानुकूलित मार्गांचा समावेश आहे. त्याशिवाय घणसोली, कोपरखैरणे, जुईनगर, या स्थानकांपासून एमआयडीसी भागात रिंगरुट बस चालवली जाणार आहे. तसेच ऐरोली ते नाहुर हा साध्या बसचा नवा मार्ग देखील सुरु केला जाणार असल्याचे सभापती गणेश म्हात्रे यांनी सांगितले. येत्या काळात अधिक २० एसी बस एनएमएमटीच्या ताफ्यात येणार असल्याचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड यांनी सांगितले. त्यामध्ये १० हायब्रीड बस असणार आहेत. या बस डिझेल तसेच बॅटरीवर देखील चालू शकणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून रस्त्यावर धावणाऱ्या जुन्या एनएमएमटीमधून प्रवास करताना प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात अनेक गाड्यांमध्ये गळती होत असून आतमधील आसन व्यवस्थाही तुटलेली आहे. अशातच १० नव्या साध्या बस परिवहनच्या ताफ्यात आल्याने प्रवाशांची या त्रासापासून मुक्तता होणार आहे. (प्रतिनिधी)